कादवा, गोदा, दारणा नद्यांना प्रथमच पूर; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे धरण जलसाठ्यात वाढ होत असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने आणखी काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे दारणा, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून प्रथमच पाच गेटमधून 12 हजार क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. दरम्यान, पालखेड धरणातून पाणी सोडल्यास या धरणातून टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करण्यात येणार आहे. संभाव्य पूरस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यासह धरण परिसरात संततधार सुरूच असल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पाटबंधारे विभागाने दारणा धरणातून 1100 क्यूसेकचा विसर्ग सुरू केला. या पाण्याबरोबरच परिसरातील पावसाचे पाणी नदी- नाल्याद्वारे धरणाच्या दिशेने येत असल्याने गोदावरी, दारणा, कादवा नद्यांना पूर आला. साहजिकच खबरदारीचा उपाय म्हणून नांदूरमध्यमेश्वर धरणातून गुरुवारी दुपारी 4 ला चार गेटमधून 4842 क्यूसेकने विसर्ग सुरू केला. जिल्हाभरातील पावसाचे पाणी तसेच पालखेड, ओझरखेड, दारणा, गंगापूर, मुकणे, वालदेवी, गौतमी, कश्यपी, वाघाड, ओझरखेड धरणे परिसरातील पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात येत असल्याने पूरस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी धरणात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी सहाला या धरणाचे पाचवे गेट उघडण्यात आले. या पाचही गेटमधून 12000 क्यूसेकने विसर्ग सुरू केला आहे. मात्र, अद्याप पालखेड धरणाचे पाणी कादवा नदीपात्रात अद्याप सोडलेले नसले, तरी रात्री पालखेडचे पाणी सोडले जाण्याची शक्यता अधिक आहे. साहजिकच नांदूर धरणातून रात्रीतून पुन्हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
धरण परिसरात पोलिसांचा पहारा
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या गेटमधून पाणी सोडल्यानंतर पर्यटक सेल्फी घेण्यासाठी तसेच फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी करतात.दरवर्षीच या गेटच्या खाली असणार्या पुलावर परिसरातील तरुणाई तसेच नागरिक गर्दी करतात. सध्या या ठिकाणी पाण्याच्या लाटा थेट पुलावर येत असल्याने कुठलाही धोका नको, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून धरणाकडे येणारे सर्व रस्ते धरणाचे, नूतनीकरणासाठी आलेले ट्रक संबंधित ठेकेदार व पोलिस प्रशासनाने रस्त्यावर आडवे लावून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या गेटजवळ सायखेडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी व महिला पोलिस पहारा देत आहेत. नागरिकांनीदेखील धरणाकडे जाण्याचे तसेच छायाचित्र अथवा सेल्फी काढू नये, तसेच आपला जीव धोक्यात घालू नये. नदीकाठीदेखील जाऊ नये. कारण सध्या नदीतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठावरील रहिवाशांनी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.