नाशिक :
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात पाच उपशिक्षणाधिकाऱ्यांसह १७ गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना अवघ्या तिघांचीच नियुक्ती झाली आहे. रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येवला पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून अमरावती येथील सय्यद गजनकर अली यांची नियुक्ती झाली आहे. तर सुरगाणा येथे संजयकुमार किसर सरवदे यांची औरंगाबाद येथून बदली झाली आहे. मालेगावला गटशिक्षणाधिकारी म्हणून मदन मोरे हे अमरावती येथून बदलून आले आहे.जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या एकूण १७ जागा रिक्त असताना केवळ तीनच अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. उर्वरित १४ जागा केव्हा भरल्या जाणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे. साडेपाच महिन्यांनंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली. त्यामुळे शिक्षण विभागातील रिक्त जागांचा प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने २९ डिसेंबर २०२२ रोजी बदल्यांचे शिक्षण विभागातील गट – ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश दिले. यात राज्यातील १०५ उपशिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे.