नाफेडचा 840 मेट्रिक टन कांदा रेल्वेने चेन्नईला रवाना

कांद्याचे दर आणखी कोसळण्याची भीती; शेतकर्‍यांमध्ये नाराजी

लासलगाव : वार्ताहर
केंद्र सरकारतर्फे नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा आता थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. शहरी ग्राहकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने हा कांदा केवळ 24 रुपये किलो दराने विक्री सुरू करण्यात आली आहे
याच पार्श्वभूमीवर लासलगाव येथून तब्बल 840 मेट्रिक टन कांद्याचे 21 डब्यांचे रेल्वे रॅक चेन्नईकडे रवाना करण्यात आले. या कांद्याचा पुरवठा चेन्नई येथील बाजारात विक्री केला जाणार असल्याने या निर्णयाचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा कांदा केवळ 24 रुपये किलो दराने विक्रीसाठी आणला जात आहे. कोलकाता, गुवाहाटीनंतर लासलगाव येथून तब्बल 840 मेट्रिक टन कांद्याचा 21 डब्यांचा रेल्वे रेक चेन्नईकडे रवाना करण्यात आला.
मागील आठवड्यात कोलकाता, गुवाहाटी आणि यानंतर आता चेन्नईसाठी 840 मेट्रिक टन कांदा रवाना करण्यात आल्याने शहरी ग्राहकांना दिलासा, तर शेतकरीवर्गाचे मात्र कंबरडे मोडले जात आहे, मात्र या निर्णयाचा फटका थेट शेतकर्‍यांना बसला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरून 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत खाली आले असून, उत्पादन खर्चदेखील परत मिळत नाही. शेतकर्‍यांना 10 ते 15 रुपये किलो तोट्याने कांदा विक्री करावा लागत आहे.

ग्राहकांना स्वस्त दराने कांदा मिळतोय हे योग्य आहे. मात्र, शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर मुंबई आणि दिल्ली येथे मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
– भारत दिघोळे, अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात येताच दर आणखी पडले. उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी हतबल झाले आहेत. ग्राहकांच्या ताटात स्वस्त कांदा पोहोचत असला तरी शेतकर्‍यांचा घामाने पिकवलेला माल तोट्यात जात आहे.
– सुनील गवळी, कांदा उत्पादक ब्राह्मणगाव(विंचूर)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *