पाण्यासाठी जीव धोक्यात

दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ

इगतपुरी : वार्ताहर
एकीकडे शासन आदिवासी बांधवांना सर्व सुविधा देण्याची घोषणा करीत असताना, मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे ताजे उदाहरण म्हणजेच इगतपुरीतील कथरुवंगण पाड्यातील आदिवासी महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुर्दैव म्हणजे धोकेदायक अशा रेल्वे क्रॉसिंग करून 2 ते 3 टेकड्या चढत जवळपास दोन कि.मी. पाण्यासाठी भटकंती करूनदेखील अतिशय दुर्गंधीयुक्त हॉटेल व्यावसायिकांनी वापरलेले पाणी पिण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर
आली आहे.
या समस्येला येथील महिला, मुली मेटाकुटीला आल्या आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांची निव्वळ बोळवण करीत असल्याने पाणी मागायचे तरी कुणाकडे, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या पाड्यात एकूण 45 घरे आहेत. ज्यात जवळजवळ 200 लोकवस्ती करून राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगर परिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळकनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकीत हे पाणी साठवले जाते. पंधरा दिवसांत एक वेळा जास्तीत जास्त वीस मिनिटे पाणीपुरवठा केला जातो, असे येथील आदिवासीबांधव सांगतात.सध्या तेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते. मात्र, हे पाणी गढूळ, उंदीर व साप मेलेले आणि केस असलेले पाणी पुरविण्यात येत असल्याचे महिलांनी सांगितले.

 

उत्तर महाराष्ट्रासह मुंबईसारख्या महानगराची तहान भागवणारा हा इगतपुरी तालुका आज स्वतःच पाण्याविना व्याकूळ झालेला आहे. इगतपुरीतील काही गावांची, पाड्यांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते. येथील पाड्यांची अवस्था येथील स्थानिक प्रशासन चांगलेच जाणून आहे. मात्र, ही अवस्था पालटायला काहीच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. यांचा पाण्याचा वनवास कधी संपणार, हाच प्रश्‍न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *