कोरोना यंत्रणा सज्ज

कोरोना यंत्रणा सज्ज

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन स्ट्रेनच्या एका नव्या व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. असून त्याचे वर्गीकरण ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असं करण्यात आले आहे. भारत, चीन, ब्रिटन आणि अमेरिकेसहित जगभरातील अनेक देशांमध्ये हा जेएन.१ व्हेरिएंट आढळला आहे. त्याच्यासह कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंताही वाढत चालली असली, तरी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार म्हणत आहे. लोकांच्या संपर्कात असलेल्या राजकीय आणि सरकारी अधिकारी, उच्च पदस्थांना कोरोना होतो तेव्हा दखल घ्यावीच लागते. महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिवाय देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद शनिवारी झाली, तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यावरुन धोका वाढत चालला आहे. त्यामुळे ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. एका महिन्यात जगभरात ५२ टक्के रुग्णांची वाढ झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. संपूर्ण भारतात शुक्रवारी (२२ डिसेंबर) दुपारपर्यंत ६४० नवे रुग्ण आढळले होते. एकट्या केरळ राज्यात २६५ रुग्ण सापडले होते. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारीदेखील देशभरात शेकडो नवे रुग्ण आढळले. देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. चार रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या भारतात ३,४२० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहे. यापैकी ५६५ रुग्ण एकट्या केरळ राज्यात आहेत. महाराष्ट्रातही शनिवारी १९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूक आणि एक्सवर याबाबतची माहिती दिली. नागपूर अधिवेशन संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता ते असल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते मागील चार दिवसांपासून क्वारन्टाईन (विलगीकरण कक्षात) राहून उपचार घेत आहेत. सध्या थंडीचं वातावरण असून नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. थंडीतच आणि डिसेंबर महिन्यातच कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतो. मुळात कोरोना विषाणू आता आपल्या वातावरणात स्थिरावला आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे म्हणजे हा विषाणू एंडेमिक झाला आहे त्यामुळे हवामानानुसार त्यामध्ये वाढ आणि घट होऊ शकते. सध्या देशासह राज्यात शीतलहर सुरु आहे. या सीझनल बदलामुळे इन्फ्ल्युएंझा, कोरोना आजारामध्ये वाढ होते आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमध्ये काही प्रमाणात जी वाढ होताना दिसते आहे ती केवळ जेएन. १ मुळे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. या वाढीमध्ये हवामानविषयक घटकांचा वाटा मोठा आहे. येणाऱ्या काळातही इन्फ्ल्युएंझाप्रमाणे कोव्हिडदेखील पावसाळा आणि हिवाळयात काही प्रमाणात वाढू शकतो, असे मानले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये गेल्या दोन दिवसांत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात केरळपाठोपाठ अनुक्रमे कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. हिवाळ्यात कोरोना आणि इतर संसर्ग वाढू शकतात, असा इशारा जागतिक संघटनेने दिला आहे. कोरोनाचा व्हायरस कालांतराने विकसित होत जातो आणि याचे नवे व्हेरिएंट समोर येतात.यातील ओमिक्रॉन हा व्हेरिएंट खूप प्रबळ ठरला होता. जागतिक आरोग्य संघटना सध्या ओमिक्रॉनशी संबंधित प्रकरणांचा आणि त्याच्या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास करत आहेत. मात्र, जेएन.१’ तितकासा धोकादायक मानला जात नसला, तरी त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे.लशींद्वारे शरीरात निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीसमोर हा व्हेरिएंट कितपत टिकाव धरतो, याचे मर्यादित पुरावे उपलब्ध आहेत. मागील व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हेरिएंटमुळे लोक जास्त आजारी पडल्याची प्रकरणे अद्याप समोर आलेली नाहीत. ही दिलासादायक बाब असली, तरी गाफील राहून चालणार नाही. लोकांच्या आरोग्यावर या व्हेरिएंटचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. संक्रमण आणि गंभीर आजार टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नेहमीप्रमाणे काही सल्ले दिले आहेत.गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात धरा, हात नियमित स्वच्छ करा, लसीकरणाच्या बाबतीत दक्ष रहाआजारी असल्यास घरी विश्रांती घ्या, लक्षणे आढळल्यास चाचणी करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. “ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही, याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित करत माहिती घेतली. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारतात यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची तीन पटीने वाढ झाली. ९ ते १५ डिसेंबर दरम्यान २१ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले, तर २६ ते २२ डिसेंबर दरम्यान ६८ जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ६४ टक्के रुग्ण हे मुंबईमधील आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यामध्ये एकूण ६७६ जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी १९ जण पॉझिटिव्ह आढळले. माजी टास्क फोर्स सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार, सध्या घाबरण्याची गरज नाही. पण सध्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्षही करता येणार नाही. हा विषाणू सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे लोकांनी सावध राहिलेले कधीही उत्तम. विशेषत: ज्यांना इतरही आजार आहेत. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. मास्क घालणे खूप महत्वाचे आहे. सरकारला मानव संसाधनाकडे लक्ष देण्याबरोबरच चाचणी सुविधा मजबूत करावी लागेल. असे त्यांनी सूचित केले आहे. यावरुन जागतिक, देश आणि राज्य पातळीवर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *