पाडळीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष

खंडेराव महाराज यात्रोत्सवात भंडार्‍याची उधळण

ठाणगाव ः वार्ताहर
येथून जवळच असलेल्या पाडळी येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात झाला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीने अवघी पाडळी न्हाऊन निघाली.
यात्रोत्सवासाठी गेल्या तेरा वर्षांपासून जेजुरी येथून ज्योत आणण्यासाठी गावातील 200 ते 250 तरुण जातात. यावर्षीही तरुणांनी मोठ्या उत्साहात जेजुरीला जाऊन खंडेरायाची मशाल ज्योत आणली. दरवर्षी 16 ते 17 तासांत ज्योतीचे पाडळीमध्ये आगमन होते; परंतु यावर्षी उन्हाळा जास्त असल्याने 20 ते 21 तास लागले. मशाल ज्योतीचे पाडळीच्या शिवारात आगमन झाल्यानंतर चिंचखिंडी ते पाडळी अशी बँजो, ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत आगमन झाल्यानंतर सायंकाळी संपूर्ण गावातून ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे दोन तास सुरू असलेल्या मिरवणुकीत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीत उत्साह संचारला. मारुती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर खंडेरायांचा जयघोष आणि भंडार्‍याची उधळण करीत सर्व गावकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. माहिलांनी पिवळे वस्र परिधान करून आनंद साजरा केला.
दुसर्‍या दिवशी खंडेराव महाराज यांच्या काठीची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी आठ वाजेपर्यंत गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सुरू होती. सायंकाळी करमणुकीसाठी दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.
तिसर्‍या दिवशी सकाळी तमाशाची हजेरी व सायंकाळी कुस्त्यांची दंगल झाली. यामध्ये 101 रुपयांपासून तर 5001 रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. अकोले तालुक्यातील
समशेरपूर व जुन्नर येथील पहिलवानांची शेवटची कुस्ती झाली. यावेळी पहिलवानांच्या अंगावर गुलाल उधळून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अकोले, संगमनेर, जुन्नर,
समशेरपूर, भगूर, नाशिक, इगतपुरी, कोंभाळणे आदी भागातून मोठ्या संख्येने पहिलवानांनी कुस्तीच्या दंगलीत सहभाग घेतला.
यात्रोत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान रेवगडे, राजेंद्र वारुंगसे, अण्णा रेवगडे, राजू रेवगडे, सुभाष जाधव, चंदू जाधव, शांताराम रेवगडे, बाबूराव बोगीर, धनंजय रेवगडे आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *