मनमाड, आमोदे परिसरात गारपीट, पिकांचे नुकसान
मनमाड : प्रतिनिधी
शहर परिसरात सोमवारी (दि. 5) विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसाने छोट्या-मोठ्या व्यापार्यांची धावपळ झाली, तर शेतकर्यांचे कांदा पिकासह इतर नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा अडचणीत सापडला आहे.
हवामान खात्याने येत्या 10 मेपर्यंत राज्यात विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह गारपिटीची शक्यता वर्तवली होती. मनमाड शहरासह परिसरात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास आभाळ भरून आले.त्यानंतर विजांचा कडकडाट व वादळी वारा सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पाऊस झाल्यानंतर गारा पडायला लागल्या. पावसामुळे व्यापारी वर्गाची धावपळ झाली. शेतकर्यांनी काढून ठेवलेल्या कांद्याचे काही ठिकाणी नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे बळीराजा आणखी संकटात सापडला आहे.
कांदा, मका पिकांचे नुकसान
नांदगाव प्रतिनिधी : नांदगाव तालुक्यातील आमोदे परिसरात सोमवारी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाली. पावसासह गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिसरात दुपारी तीननंतर हवामानात अचानक बदल होत पावसाचे वातावरण तयार झाले. अचानक आलेल्या या पावसाबरोबरच गारपिटीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याची वेळ शेतकर्यांवर येऊन ठेपली. सध्या आमोदे परिसरात कांदाकाढणीसह मका सोगणीला वेग आला आहे. त्यात बेमोसमी पावसाने वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावल्याने पिके पूर्ण भिजली.