येवला तालुक्यात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा

विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण

येवला ः प्रतिनिधी
येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने मोठा कहर केला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. हातपंपांना पाणी नाही. तालुक्यातील अनेक गावांत असणार्‍या तलावातील पाणी आटले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी येवला पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या वतीने येवला तालुक्यातील 31 गावे, 41 वाड्यांंना 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल अशा गावांनादेखील प्रस्ताव आल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे असले, तरी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ करण्यात यावी.
गावातील वस्त्यांवरदेखील पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण
भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
येवला तालुक्यातील अनेक खेड्यांत हातपंपांना पाणी आहे. मात्र, हातपंप नादुरुस्त आहेत. अशा नादुरुस्त हातपंपांची पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती करावी. त्यामुळे पाणीचेे स्रोत निर्माण होऊन पाणीटंचाईला आळा बसेल. दुरुस्त केलेल्या हातपंपांचे पाणी ग्रामस्थांना मिळेल, यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात तालुक्यातील कोणत्या भागात नादुरुस्त हातपंप आहे, याचा सर्व्हे करून सर्व हातपंप दुरुस्त करणे आवश्यक आहे. तालुक्यातील बर्‍याच गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे, तर काही विहिरींना जेमतेम पाणी शिल्लक असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारापाणी नसल्याने शेतकर्‍यांची पंचायत झाली आहे. गवत वाळले आहे आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि त्यातच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने जनावरांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील काही जनावरे पाळणार्‍या ग्रामस्थांनी
आपली जनावरे इतर ठिकाणी आपल्या नातेवाइकांकडे पोहोच केली आहे.
हरणांचीदेखील अन्न व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तालुक्यातील राजापूर, ममदापूर, खिर्डीसाठे, नगरसूल शिवार, तसेच इतर ठिकाणी हरणांची कळप कायमस्वरूपी वास्तव्याला आहेत. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे असंख्य हरणे वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी तसेच अन्नाच्या शोधासाठी वणवण भटकंती करीत असतात. अशा परिस्थितीत विहिरीत पडून अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक हरणे गंभीर जखमी झाली आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी वन विभागाने हरणांसाठी पाण्याची आणि अन्नाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
तालुक्यातील राजापूर, ममदापूर या भागात हरणांची संख्या अधिक प्रमाणात आहे. या ठिकाणी वन विभागाने हरणांसाठी पिण्याच्या पाण्याचे पाणवठे बांधले असले, तरी या बांधलेल्या पाणवठ्यात पुरेसे पाणी नसल्याने हरणांची पाण्यासाठी वणवण होत असते. हा प्रकार नेहमीच दरवर्षी उन्हाळ्यात पाहावयास मिळतो.
काही सामाजिक बांधिलकी असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने हरणांसाठी याठिकाणी पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे हरणांना पाणी मिळते. याठिकाणी हरणांचे कळप मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे वन विभागाने अधिक प्रमाणात पाणवठे निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *