पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक ः प्रतिनिधी
भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या आक्रमणाला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे देशभरात देशभक्तीची लाट उसळली आहे. जवानांच्या या अतुलनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनावरून संपूर्ण देशात ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले. नाशिकमध्येही या रॅलीला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवले.
नाशिकमधील ‘तिरंगा रॅली’ची सुरुवात पंचवटी कारंजा येथून करण्यात आली. प्रारंभी गोदावरी नदीच्या काठावर उपस्थित मान्यवरांनी गोदामातेची आरती करून तसेच वंदन करून देशाच्या सार्वभौमतेसाठी प्रार्थना केली.
ही रॅली पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, मेन रोड, धुमाळ पॉइंट, हुतात्मा स्मारक येथे आणण्यात आली. देशाच्या जयजयकाराच्या घोषणांतून तिरंगा रॅली पार पडली.
या रॅलीत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, मंडल अध्यक्ष तसेच भाजपचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपस्थळी हुतात्मा स्मारकाजवळ नेत्यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटतो आहे. नाशिककरांनी या तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेमाची जाणीव अधोरेखित केली आहे.
पावसाळी वातावरणामुळे रॅलीला काहीसा विलंब झाला, तरीही पावसाच्या सरींसह तिरंगा हाती घेऊन नागरिकांनी रॅलीत भाग घेतला. माजी सैनिकांसह एनएसएसचे विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रॅलीमध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते.
या रॅलीदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान, जय किसान अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते. अनेकांनी तिरंगा अंगावर परिधान केला होता, तर काहींनी फेटे बांधून सहभाग नोंदवला.