एकेरी वाहतूक अन् पावसामुळे अपघातांत वाढ, वाहनचालक त्रस्त
निफाड : तालुका प्रतिनिधी
पिंपळस ते भरवस फाट्यापर्यंतचा रस्ता एका बाजूने खोदून ठेवल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पावसासह वाहनांच्या गर्दीमुळे एकाच दिवसात याच रस्त्यावर पाच ठिकाणी लहान-मोठे अपघात झाले. दररोज अपघात होत असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने त्वरित उपाययोजनांची गरज आहे.
पिंपळस ते येवल्यापर्यंत रस्ता संबंंंधित ठेकेदाराने खोदून ठेवल्याने एकेरी वाहतुकीमुळे अपघात होतात. पावसामुळे वाहनचालक डांबरी रस्त्यावरून खाली गाडी उतरवत नसल्याने समोरून येणारे वाहन पास होताना अनेकदा दुचाकीस्वार मध्ये घुसतात. कधी पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनाला धडक बसते, तर कधी मागचे वाहन जोरात येऊन पुढच्या वाहनावर आदळते. शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी अशाच प्रकारचे अपघात झाले. जळगाव फाटा येथे मोटारसायकलला मागून धडक बसल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर शिवरे फाटा येथील अपघातात एक, तर निफाडजवळ हॉटेल सिंगापूरजवळ मोटारसायकलने छोटा हत्तीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.
विंचूरजवळ आणि बोकडदरे परिसरात त्याच दिवशी अपघात झाले. साहजिकच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्या लग्नसराई असून, अनेक विवाह गोरजमुहूर्तावर होत आहेत. त्यामुळे वाहतूक वाढून अपघातही वाढत असल्याचे चित्र आहे. निफाड परिसरात सर्वच लॉन्स, मंगल कार्यालये याच महामार्गाच्या कडेला आहेत. निफाड शहरात बाजार समिती प्रवेशद्वारासमोर दररोज ट्रॅॅफिक जॅम होत असताना प्रशासनाला त्यावर उपाय सापडलेला नाही.
शहरातून जाणार्या प्रमुख रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्याने रहदारीला अडथळा ठरत असताना, केवळ राजकीय पदाधिकार्यांचे हितसंबंध आडवे येत असल्याने ही अतिक्रमणे काढण्याचे कुणी धाडस करू शकत नाही. मात्र, याच अतिक्रमणांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे अन् त्यामुळेच अपघात होत आहेत.
वाहतूक कोंडीची डोकेदुखी
सध्या निफाड शहराचा विस्तार सर्व बाजूंनी होत आहे.
त्यामुळे शहरातून जाणार्या मार्गांवरदेखील वर्दळ वाढली आहे.
त्यात निफाड बसस्थानकाला दोन प्रवेशद्वार असतानाही
बसेस ये-जा करण्यासाठी एकाच प्रवेशद्वाराचा वापर करत असल्याने
पिंपळगाव-निफाड मार्गावर वाहतुकीची कोंडी होते.
त्यामुळे बसस्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराचा वापर
वाहने बाहेर जाण्यासाठी केला तर ही कोंडी कमी करता येईल.
त्याचबरोबर निफाड पंचायत समिती ते शांतीनगर चौफुलीपर्यंत
रस्त्यावरील अतिक्रमणे काढली तर वाहतुकीची कोंडी टळू शकते.
मात्र, त्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा, हाच खरा प्रश्न आहे.