कळवण तालुक्यात अवकाळीच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनदरबारी सादर
कळवण : प्रतिनिधी
वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील 92 गावांमधील 946 शेतकर्यांच्या 378.25 हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांनुसार महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनस्तरावर 1 कोटी 2 लाख 11 हजार 410 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनस्तरावर सादर केला आहे.
एप्रिलपाठोपाठ मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकर्यांना बसला. 6 ते 14 मेदरम्यान तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात दाणादाण
उडाली.
काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरलेदिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु., दरेभणगी, भैताणेदिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा येथील घरांचे पत्रे, कांदा चाळीचे पत्रे, भिंत पडून घराचे तसेच बैलगोठा, हॉटेल व घरांचे 98 ठिकाणी नुकसान झाले होते.
महसूल, कृषी विभागाच्या संयुक्त अहवालनुसार फळपिके सोडून कोरडवाहू जिराईत पिकाखालील 33 टक्क्यांवरील एका शेतकर्याचे 0.10 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून, 1360 रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे. फळपिके सोडून बागायत वार्षिक फळपिकाखालील 91 गावे बाधित झाले असून, 945 शेतकर्यांचे 378.15 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्यात कांदा 326.50 हेक्टर, गहू 0.50 हेक्टर, 23.45 हेक्टर बाजरी, 4.80 हेक्टर मिरची, 9.10 हेक्टर टोमॅटो, मका 0.20 हेक्टर, भाजीपाला 13.60 हेक्टर नुकसान झाले.
कांद्याचे 326 हेक्टर क्षेत्रात नुकसान
अवकाळी पावसामुळे सुमारे 378 हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंबा, फळबागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र 28 हजार 716 हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात 326.50 हेक्टर क्षेत्रावरील शेतकरीवर्गाचे नुकसान झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौर्यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकार्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
– नितीन पवार, आमदार, कळवणमे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 92 गावांतील 378.25 हेक्टर क्षेत्र बाधित होऊन 946 शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले. 98 ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
– रोहिदास वारुळे, तहसीलदार, कळवण