कुटुंबापासून त्रासलेल्या मायलेकीला मायेचा आधार

पिंपळगाव पोलिसांचे सामाजिक संदेश देणारे कार्य, सैंगऋषी आश्रमाच्या स्वाधीन

पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
पोलिसांना कर्तव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते. असे असले, तरी या वर्दीतही मनुष्य असतो, त्यालाही मन, भावना असतात. ड्यूटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो. अशाच खाकी वर्दीत दडलेल्या पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. पती आणि माहेरच्या व्यक्तींकडून त्रासलेल्या दोन चिमुकल्या आणि एका मातेला मायेचा आधार देत वर्दीतील माणुसकीची ओळख करून दिली आहे.
अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत शहरात मंदिर परिसरात अंदाजे पाच ते सहावर्षीय दोन चिमुकल्या तसेच एक महिला परिसरात आढळून आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तू झनकर व त्यांच्या मित्रांनी त्यांना पिंपळगाव पोलिसांशी संपर्क साधत त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, सदर महिला पनवेल येथील असल्याचे सांगत होती; परंतु पती आणि माहेरची व्यक्ती मानसिक आणि शारीरिक त्रास देत असत आणि त्यानंतर दोन चिमुकल्यांसह त्यांनी घराबाहेर काढून दिले. तेव्हापासून गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यात दोन मुलींना घेऊन भटकंती करत आहे.
पुन्हा पतीकडे आणि माहेरी जायचे नाही, असेच जगायचे. मात्र, मुलींची काळजी असल्याचे सांगितले. यादरम्यान पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी त्यांना पोटभर खाऊपिऊ घातले व प्रवासासाठी काही पैसे दिले. मात्र, दोन मुलींना घेऊन जायचे कुठे, असा गंभीर प्रश्न त्या महिलेला पडला. तेव्हा पोलिस निरीक्षक तिवारी यांनी त्या मुलींना शाळेत जाल का? तेव्हा मोठ्या उंच स्वरात मुली हो म्हणाल्या. डॉक्टर, पोलिस आम्हाला व्हायचं, असे म्हटल्यावर पोलिस अधिकार्‍याचे डोळे पाणावले. यावेळी येवला येथील सैंगऋषी वृद्ध, अनाथ आश्रमास संपर्क साधून या निराधार महिला व त्या दोन चिमुकलींना त्यांच्या स्वाधीन करून त्यांना आधार दिला. यावेळी मोठ्या आनंदात त्या आश्रमात गेले. यादरम्यान पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सैंगऋषी वृद्ध, अनाथ आश्रमाचे नवनाथ जर्‍हाड, गोकुळ खैरनार, विकास वाळुंज, शुभम उगले, सामाजिक कार्यकर्ते दत्तू झनकर, हवालदार ऊर्मिला काठे, सविता धामणे आदी उपस्थित होते.

आमच्या आश्रमात आतापर्यंत अनेक वृद्ध, तसेच अनाथ महिला, मुले-मुली व व्यक्ती असून, आज पिंपळगाव पोलीस ठाण्यामार्फत एक निराधार महिला आणि त्यांच्यासोबत लक्ष्मी व रेणुका नावाच्या दोन चिमुकल्या मिळाल्या आहेत. त्या दोन चिमुकल्या मुलींना भविष्यात चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर आणि पोलिस व्हायचं आहे. आमच्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांचे नक्कीच चांगले शिक्षण होईल आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
– नवनाथ जर्‍हाड, संस्थापक, सैंगऋषी वृद्ध, अनाथ आश्रम, येवला

सध्या कौटुंबिक वादातून असे अनेक प्रकार घडत असून, निष्पाप लहान चिमुकल्यांचे भविष्य संपुष्टात येत आहे. पालकांनी आपल्या पती-पत्नीच्या किंवा कौटुंबिक नात्यात क्लेश निर्माण करण्याअगोदर आपल्या मुलांचा आणि परिवाराचा विचार करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठेतरी असे प्रकार रोखले जाऊ शकतात.
– दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *