प्रेमाचा घातकी त्रिकोण
लग्न म्हणजे दोन जीवांचा पवित्र बंध. एकमेकांवर विश्वास. केवळ विश्वासावर लग्नसंस्था टिकून आहे. लग्नानंतर प्रेम, विश्वास आणि समर्पण या नात्याचा पाया असतो. या नात्याची पाळेमुळे जेव्हा हलतात तेव्हा त्यातून निर्माण होणारे प्रसंग समाजाला हादरवण्याबरोबर लग्नसंस्थेच्या विश्वासाला तडा जाणारे ठरतात. इंदूरच्या मर्डर मिस्ट्रीने समाजासमोर भीषण, विकृत आणि क्रौर्याने भरलेले वास्तव उघडकीस आले आहे.
या प्रकरणात तरुणी सोनम रघुवंशी हिच्या वागणुकीने लग्नसंस्थेवर स्त्रीच्या भावना आणि प्रेम या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्रियकरासोबत प्रेमसंंबंध असताना निष्पाप नवर्याचा जीव घेण्याचा काय अधिकार, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रेमाच्या घातकी त्रिकोणात हकनाक बळी गेलेल्या राजा रघुवंशीच्या परिवाराची न भरून निघणारी हानी झाली. ती कोणत्याही उपायाने भरून निघणारी नाही. अशा घटनांमुळे लग्नसंस्थेचा पाया डळमळीत होत आहे.
राजा रघुवंशीशी सोनमचा विवाह झाला. नव्या आयुष्याची सुरुवात दोघांनी एकत्र केली. हनिमूनसाठी ते मेघालयाला गेले, पण हा हनिमून त्यांच्या जीवनातील शेवटचा असेल असे त्याला वाटले नसावे. भविष्यातील स्वप्न साकार करण्याच्या आणाभाका घेत संसाराचे स्वप्न रंगविणार्या राजा रघुवंशीला स्वप्नातही आपला बळी दिला जाणार आहे, हे यत्किंचितही ठाऊक नसावे. कारण सर्वसामान्यपणे कोणीही कोर्या पाटीने संसाराला सुरुवात करीत असतो. त्या पाटीवर सुखी संसाराचे स्वप्न रंगवायचे की, त्याला रक्तरिंंजत थारोळ्यात डुबवायचे हे कोणाच्या मनात काय सुरू आहे, हे सांगता येत नाही.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, सोनमच्या प्रेमसंबंधांमागचा खरा चेहरा. हनिमूनसाठी बाहेर गेल्यावर प्रियकरासोबत पळून जाणार्या तरुणींंच्या अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. लग्नाच्या पहिल्या मुळालाच माहेरी जाऊन न परतणार्या घटना आपण पाहतो. किंवा फसवे लग्न करून तरुणी आणि त्यांची टोळी सक्रिय असते. ते उपवर मुले शोधून जाळे टाकतात. पैसे, दागिने घेत फरार होणार्या घटनाही समाजात घडत आहेत. या घटनेत एक पाऊल पुढे जात सोनमने एवढे क्रौर्य करावे? समाजात आजही स्त्रीकडे सहानुभूतीने पाहिले जाते. ती प्रेमळ, समर्पित, माया, ममता देणारी असते, अशीच धारणा असते; परंतु काही प्रकरणांत तरुणी अतिरेकी आत्मकेंद्रित होतात त्यावेळी त्या किती क्रूरपणाचा कळस गाठू शकतात, याचे उदाहरण म्हणजे सोनमसारख्या तरुणी.
लग्नसंस्था आज गंभीर संकटात आहे. पूर्वी लग्न म्हणजे जीवनभराचा स्वखुशीने केलेला करार असायचा. आता दुर्दैवाने काही लोकांसाठी तो नफ्यातोट्याचा करार बनत चालला आहे. जोडीदाराचे भावविश्व, विश्वास आणि नात्याचा अर्थ सर्वांचा खेळ करीत स्वार्थ, ऐषोराम, प्रेमासाठी अमानवी निर्णय घेत समाजाला धक्का देत आहे.
काही जण मॉडर्न क्राइम ऑफ पॅशन असे म्हणत आहेत, तर काही निव्वळ विकृती, असे म्हणत आहेत. अशा घटनांमुळे निष्पापांचे बळी जात आहेत.
या प्रकरणामुळे लग्न जुळवताना मुलगी आणि मुलाची पार्श्वभूमी दोघांच्या सामाजिक वर्तवणुकीची चौकशी होते का? लग्नानंतर अचानक बदललेली वृत्ती समजण्याआधीच अनेक वेळा उशीर झालेला असतो. केवळ देखणी मुलगी, मुलगा आर्थिक बाजू, सामाजिक प्रतिष्ठा पाहून लग्न न ठरवता माणुसकी, समाजातील त्यांची प्रतिमा कशी आहे, हे पाहणे गरजेचे आहे.
सोनमसारख्या घटना समाजातील स्त्री-पुरुष नात्यातील विश्वास डळमळीत करतात. केवळ मालिका, सिनेमांमध्ये असे प्रसंग घडलेले दाखवत असावेत, असा समज अशा घटनांमुळे खोटा ठरविला आहे. एका तरुणीला प्रेमाच्या नावाखाली लग्नाच्या आडून नवर्याचा जीव घेण्याचा काय अधिकार? सोनम ही केवळ एकीची गोष्ट नाही. अशा बेवफा सोनम अजून समाजात किती निष्पापांचा जीव घेणार?
देवयानी सोनार