मुंबई लोकल, एक जीवघेणा प्रवास

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. इथलं जीवन वेगवान आणि धावपळीचं. या शहराच्या शिराप्रमाणे धावणारी मुंबई लोकल ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर लाखो मुंबईकरांचं दैनंदिन आयुष्य आहे. परंतु, हेच आयुष्य कधी कधी धोक्याच्या झुल्यावर लटकत असतं, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.
मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान, सोमवारी सकाळी घडलेली दुर्घटना हे त्याचं ताजं उदाहरण. आठवड्याचा पहिला दिवस अनेक तरुण-तरुणी आपापल्या नव्या नोकरीच्या दिशेने, नव्या स्वप्नांची शिदोरी घेऊन घरातून निघाले होते. परंतु, या प्रवासाचा शेवट इतका भयाण असेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. सकाळच्या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. अनेकजण दरवाज्यातच लटकून प्रवास करतात. सोमवारीही तसंच होतं. लोकल भरून निघाली होती. पण मुंब्रा आणि दिवादरम्यान समोरून येणार्‍या लोकल ट्रेन एकमेकांना घासून गेल्या. वेग जास्त असल्याने जोरदार धक्का बसला आणि लोकलच्या दारात उभे असलेले 10 ते 12 प्रवासी थेट पटरीवर फेकले गेले. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेने संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. रेल्वे प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी मदतकार्यात व्यस्त होते. तरीही या अपघातानंतर अनेक गंभीर प्रश्न पुन्हा उभे राहतात.इतक्या वर्षांपासून मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत आपण नेमकं काय शिकलो आहोत? हजारो प्रवासी दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत असताना, सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून अजूनही ठोस पावलं का उचलली जात नाहीत? मुंबई लोकल ही एक जीवनवाहिनी आहे, पण आज तिच्या रुळांवर मृत्यूची छाया पसरली आहे. एक जॉबचा पहिला दिवस, एक स्वप्नांचा प्रवास… आणि अचानक घडलेली एक शोकांतिकेची कहाणी. आपण फक्त श्रद्धांजली वाहून पुढे न जाता, प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे.
उदाहरणार्थ ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम. अलार्म सिस्टिम, आत्याधुनिक प्रणाली वापरण्यात यावी…..वंदे भारत आणि वातानुकूलित लोकलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. एकदा दरवाजा बंद झाला, की पुढील स्थानकावरच तो उघडतो. यामुळे दरवाज्यात उभे राहण्याचा धोका टळतो. प्रवासी सुरक्षित राहतात आणि गर्दीवरही नियंत्रण ठेवता येतं. रेल्वे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून, सर्व लोकल गाड्यांमध्ये ही प्रणाली लागू करणं काळाची गरज बनली आहे. अन्यथा, ‘मुंबई लोकल धावणारा मृत्यू’ हे वर्णन लवकरच खरं वाटू लागेल.

                भैयासाहेब कटारे

9850060040

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *