भगूरच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
भगूर येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्मशानभूमीचे त्वरित नूतनीकरण करून सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निवेदन मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिले आहे.
भगूर नगरपालिकेच्या दारणातीरी असलेल्या स्म्शानभूमीची अवस्था दयनीय झालेली आहे. यातील स्वच्छतागृहांमधील गैरसोय, कचर्‍याची विल्हेवाट, तसेच शेड गळणे आणि इतर काही मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमीत पाऊस झाल्यास बसण्याच्या जागेवर पाणी साचते. त्यामुळे स्मशानभूमीत येणार्‍या लोकांची गैरसोय होते. स्मशानभूमीतील सोयीसुविधांअभावी अंत्यविधीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, असे मनसेच्या वतीने शहराध्यक्ष सुमित चव्हाण व मनसे शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख, भाजप उपाध्यक्ष नीलेश हासे, शिवसेना शिंदे गटाचे सुनील जोरे यांनी दिला.
स्मशानभूमीत नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थित विल्हेवाट लावावा आणि स्वच्छतागृह व पाण्याची सोय असावी.
स्मशानभूमीच्या नूतनीकरणासह नवीन बेड, बसण्याची जागा, शेड आणि लाईट, अंत्यविधीस आलेल्या नातेवाइकांना बसण्यासाठी व्यवस्था, शेडला लागलेली गळती दूर करावी, स्मशानभूमीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मनसे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, प्रवीण वाघ, संदीप बागडे, हरीश देशमुख, मयूर चव्हाण, वैभव गायकवाड, अभिषेक चव्हाण, स्वप्निल देशमुख, सोनू देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *