हितचिंतक

वास्तविक आणि खरे हितचिंतक हे नेहमीच कठोर भूमिकेत असतात. तसं पाहिलं तर बंधन हे सध्या कोणालाही नको आहे. नियंत्रणमुक्त जीवन, मुक्त संचार जीवनशैली हा दिवसेंदिवस मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्याने याचे विपरीत परिणामदेखील होत आहेत. त्यामुळे सामाजिक संस्कार, नियंत्रण, शिस्त हे बहुतांश लोकांना नको आहे.
शिस्त कोणालाच नको नसते. पण आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ नये. भविष्य व्यवस्थित घडावं म्हणून आपले हितचिंतक आपल्याला शिस्त लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. आपल्या हितासाठी ते कधी कठोर, तर वेळ प्रसंगी अति कठोर भूमिकासुद्धा घेत असतात. या भूमिकेमागील मुख्य उद्देश हा आपलं कल्याण व्हावं, हित व्हावं असाच असतो. सृष्टीवर जे काही कठोर वाटतं, भासत असतं ते आपल्या हितार्थ असतं, पण ते योग्य वेळी आपल्याला उमजत नाही. कठोर हे सत्य व वज्रासमान असल्याने ते आपल्या पचनी पडायला वेळ लागतो अथवा ते आपल्याला नकोसं वाटायला लागतं.
आपल्या आजूबाजूला अथवा संपर्कात असणार्‍या प्रत्येकाला आपलं भलं व्हावं, हित व्हावं असं वाटेलच असं नाही. एकूण परिचित-अपरिचित सहकार्‍यांपैकी खूप कमी असे असतात की, त्यांना आपलं हित व्हावं, आपलं भलं व्हावं, असं मनोमन वाटत असतं. म्हणून त्यांची इच्छा असूनदेखील त्यांच्याकडून आपल्याला मृदुत्व मिळत नाही. आपलं मन राखतात. मन सांभाळतात. अगदी ते आपल्याला हवे हवे वाटतात. तर कठोर हितचिंतक आपल्याला नकोसे वाटतात. कारण ते कठोर असतात. आपल्याला आपल्या हितापेक्षाही मृदुत्व भाळतं. मात्र, हितचिंतक हे नेहमी आपल्यासोबत कठोर भूमिकेत असतात. सत्य हे कधीच लवचिक नसून, दुटप्पीही नसतं. लाभ, स्वार्थ, हित, फायदा असेल तर गोडी अक्षरशः ऊतू जाते.
आपलं कल्याण व्हावं, ही भावना मनात ठेवून जो आपल्याला मार्गदर्शन करेल, आपल्यावर नियंत्रण ठेवेल तो वास्तविक खरा हितचिंतक असतो. त्याचं मत, भूमिका आपल्याला प्रथमदर्शनी कठोर जाणवतही असेल, पण अंतिमतः लाभदायक असते. पण स्वार्थ, लाभ अथवा महत्त्वाकांक्षा साध्य होण्यासाठी कोणी आपला हितचिंतक असेल तर तो नेहमी सावध पवित्र्यात आणि मृदू भाषेत संवाद साधतो. जेणेकरून मतलब असाध्य होणार नाही एवढी दक्षता तो बाळगून असतो. आपलं हित-अहित यासोबत फार देणं-घेणं नसणारे हितचिंतक मृदू असतात. त्यांना आपल्या जीवनाशी फार काही देणं-घेणं नसून, ते फक्त औपचारिक हितचिंतक असतात. आपला विवेक जागृत असेल आणि आपण ज्ञानसदृश्य मार्गावर असू, तर आपण गोड-मृदू न स्वीकारता कठोर हितचिंतक मार्गदर्शकांंचा आदर करून, मत स्वीकारून स्वतःचं कल्याण, हित निश्चित करून घेऊ. हित-अहित समजण्यासाठी ज्ञान असणं गरजेचं असतं. ज्ञान असलं तर सत्य-असत्य, वास्तव समजतं आणि आपलं हित आपल्याला साध्य करण्यासाठी योग्य हितचिंतकांंचं मार्गदर्शन ज्याला समजलं तो आनंदाने स्वीकारतो. यालाच वास्तविक ज्ञान म्हणतात.
आई-वडील, पालक हे आपल्या मुलांना नेहमी योग्य, पण कठोर मार्गदर्शन करतात, परंतु हेच जीवनोपयोगी लाभदायी कठोर मार्गदर्शन मुलं स्वीकारत नाहीत. त्याअनुषंगाने मग जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. या सगळ्यांवर एकमात्र उपाय हाच आहे, कठोर मार्गदर्शनाचा स्वीकार करा. स्वतःचं आयुष्य व भविष्य सुरक्षित करा.

            गणेश खाडेे  नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *