अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि. 12) एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर हे बहुचर्चित विमान आकाशात झेपावले आणि क्षर्णाधात अनेक नात्यांची ताटातूट झाली. दाट लोकवस्ती असलेल्या मेडिकल कॉलेज होस्टेलच्या इमारतीवर हे विमान कोसळल्याने त्यातील 241 प्रवासांसह अनेक भावी डॉक्टरांच्या स्वप्नांचीदेखील शब्दशः राखरांगोळी झाली. सव्वा लाख लिटर इंधन घेऊन हवेत झेपावलेले हे विमान इमारतीवर कोसळताक्षणीच त्याठिकाणी अग्निकुंड धगधगले. ओळख पटू शकणार नाही अशी परिस्थिती या अग्निकुंडात सापडलेल्यांची झाली; परंतु अशाही परिस्थितीत विमानातील सीट नंबर 11 एवर बसलेले विश्वासकुमार रमेश या अपघातातून बचावले आहेत. विमान प्रवासात ज्याच्या वाटेला ही सीट येते त्यांचे नशीब फारच वाईट समजले जाते. मात्र, याच सीटवर बसल्याने विश्वासकुमार यांचे प्राण वाचले यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. कारण विमानाच्या मध्यभागी असलेल्या या सीटवर अवघडलेल्या स्थितीत बसावे लागते व सर्वांत शेवटी उतरावे लागते. तिथे केवळ लहानशी गोलाकार खिडकी असते. असे हे नापसंत सीट विश्वासुकमार यांच्यासाठी मात्र लकी ठरले. या सीटवर बसल्यामुळे ते अपघात होताच विमानातून बाहेर फेकले गेले. या अपघाताचे कारण अद्याप समजलेले नसले, तरी संशयाची सुई काही प्रमाणात पाकिस्तानकडे वळली आहे. पाकिस्तानच्या हँकरनी या विमानाचे इंजिन हॅक करून बंद केल्याची काही प्रमाणात चर्चा सुरू होती. अपघात स्थळावरून डीव्हीआरही सापडला असून, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. गुजरात एटीएस टीमही या प्रकरणात समांतर तपास करत आहे. अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने, आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठविण्यात येणार आहे. बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे आधुनिक आणि इंधन-कार्यक्षम विमान म्हणून ओळखले जात असले, तरी अलीकडच्या काळात खराब उत्पादन, सदोष सुटे भाग यामुळे या विमानांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ड्रीमलायनर हे बोईंग कंपनीचे आधुनिक आणि प्रगत प्रवासी विमान समजले जाते. त्याचे अधिकृत नाव बोईंग-787 ड्रीमलायनर आहे. बोईंगने 2003 मध्ये 7 ई 7 प्रकल्पांतर्गत त्याची निर्मिती सुरू केली. पाच लाख ऑनलाइन मतांनंतर या विमानाला ड्रीमलाइनर असे नाव देण्यात आले. हे विमान 2004 मध्ये लाँच झाले आणि 15 डिसेंबर 2009 मध्ये त्याने आपले पहिले उड्डाण केले. भारतात एअर इंडिया कंपनी 2012 पासून या विमानाचा वापर करत आहे. एअर इंडियाने साउथ कैरोलिना प्रकल्पातून पहिले 787-8 विमान घेतले होते. ते दिल्ली-न्यूयॉर्क, मुंबई-लंडन अशा दीर्घ मार्गांवर उडते. या विमानाच्या रचतेन पारंपरिक अॅल्युमिनियम साहित्याऐवजी 50 टक्के हिस्सा कार्बन फायबरचा बनलेला असतो. संमिश्र साहित्याचा वापर करण्यात आल्यामुळे इंधनबचत होऊन ऑपरेटिंग खर्च कमी होतो. पारंपरिक विमानांच्या तुलनेत ड्रीमलायनरमुळे इंधन खर्चात 20 टक्के बचत होते. या विमानाची चौदा हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापण्याची क्षमता आहे. त्याच्या या लांब पल्ल्याच्या कार्यक्षमतेमुळे अनेक देश आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या विमानाचा वापर करताना दिसतात. आधुनिक केबिन डिझाइन आणि अधिक मोकळी जागा यामुळे या विमानाची प्रवासी व इंधनक्षमताही जास्त आहे. अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या या विमानात 242 प्रवासी आणि सव्वा लाख लिटर इंधन होते. लांबच्या आरामदायी प्रवासासाठी पंचवीस हजार ते दोन लाख रुपये खर्च करून या विमानाला पसंती दिली जाते; परंतु तांत्रिक प्रगती असूनही बोईंग ड्रीमलायनरला अनेक वादांना तोंड द्यावे लागले आहे. या विमानांत हायड्रॉलिक गळती, फ्लॅप समस्या आणि आपत्कालीन लँडिंगसारख्या तांत्रिक बिघाडांच्या अनेक तक्रारी आहेत. आता तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी सहसचिव डॉ. सनत कौल यांनी दहा वर्षे जुन्या या विमानाचे दोन्ही इंजिन एकाच वेळी कसे निकामी होऊ शकतात? हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. डॉ. कौल यांच्या म्हणण्यानुसार, बोईंग ही शंंभर वर्षे जुनी प्रतिष्ठित कंपनी आहे; परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या विमाननिर्मितीबाबत अनेक तक्रारी आहेत. डीजीसीएने याबाबत एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहीत याबाबत अवगतदेखील केले होते. बोईंग कंपनीतील अभियंता सॅम सालेहपूर यांच्या म्हणण्यानुसार, बोईंंगने 777 आणि 787 ड्रीमलायनर विमानांच्या उत्पादनात शॉर्टकट घेतले. त्यामुळे ही विमाने जसजशी जुनी होतील तसतसे त्यांच्यात मोठे तांत्रिक बिघाड होण्याचा, तसेच त्यांना मोठा अपघात होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनेची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाचेनिवृत्त किंवा सध्याचे न्यायाधीश, जे योग्य वाटतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली व्हायला हवी. यात नेमकी चूक कुणाची होती की, एखाद्या दबावाखाली विमानाने उड्डाण घेतले? हे सर्व तपासले गेले पाहिजे, अशी मागणी केली आहे. या दुर्घटनेत पुढे जाऊन अनेक मोठमोठे खुलासे होऊ शकतात. मात्र, या दुर्घटनेचा परिणाम आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवर होणारा ठरू शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचादेखील मोठा हातभार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत अनेक कलाकृतींसाठी ओळखला जातो. येथील कलात्मक मंदिरे, रूढी-परंपरा यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. विविध देशांतून भारतात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांसाठी हवाई प्रवास हाच सुरक्षित व जलद मार्ग आहे. अशावेळी हा प्रवास सुरक्षित कसा होईल यावर भारताला आता अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून गेला आहे. कोणी परदेशातून लग्नासाठी येथे आले होते, तर कोणी नुकतेच लग्न होऊन परदेशात निघाले होते. कोणी आपल्या पत्नीच्या अस्थिविर्सजनासाठी आले होते, तर कोणी नोकरीच्या निमित्ताने भविष्य घडविण्यासाठी निघाले होते. मात्र, या सर्वांची स्वप्ने हवेतच विरली आहेत.