अवकळलेल्या मराठी रंगभूमीचा लोकाश्रय!

ल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.
आचार्य अत्रे यांचा जन्म दि. 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सन 1919 मध्ये फर्ग्युसन विद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी सन 1928 मध्ये लंडन विद्यापीठातून टीडी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.
ते पुढे मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते ठरले. सासवड (जि. पुणे) या गावी जन्मलेले अत्रे सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बीए, बीटी, टीडीपर्यंत शिक्षण घेऊन होते. नंतर पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. तेथे असतानाच राजा धनराज गिरजी हायस्कूल-1927 व मुलींचे आगरकर हायस्कूल-1934 या शाळांच्या संस्थापनेत भाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. सन 1933 पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. सन 1939 नंतर मुंबईला स्थलांतर झाले.
सन 1940 मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्र क्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले. प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावाने काव्यलेखन. झेंडूची फुले-1925 हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह होता. त्यात जुन्या वळणाचे विशेषत: रविकिरण मंडळाचे कवी व त्यांच्या कविता यातील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा-1935 या संग्रहात आहे. अत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड 1933 ते 1960 हा होय. मराठी रंगभूमीचा हा अवनतकाळ होता. संगीत नाटके व नाटककार, तसेच गायक नटवर्ग यांची परंपरा खंडित व निष्प्रभ झाली होती. चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीस अनिष्ट ठरला होता.
आर्थिक मंदीमुळेही रंगभूमीचा लोकाश्रय कमी होत होता. नाट्यविषयक अभिरुचीतही परिवर्तन घडत होते. अशा काळात अत्र्यांची मुख्यत: प्रहसनात्मक व विनोदी नाट्यदृष्टी आणि अवनत मराठी रंगभूमीच्या तात्कालिक गरजा यांचा चपखल मेळ बसला. विशेष यशस्वी झालेल्या त्यांच्या एकूण बारांपैकी दहा नाटके प्रहसनात्मक व विनोदप्रचुर आहेत. गुरुस्थानी मानलेले गडकरी व फ्रेंच प्रहसनकार मोल्येर यांचा प्रभाव त्यांच्या नाटकांवर पडलेला दिसतो. त्या नाटकांत सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत पण उपहास, उपरोध, विडंबन व अतिशयोक्ती या विनोदसाधनांच्या द्वारा ते प्रकट केले आहेत.
साष्टांग नमस्कार-1933, भ्रमाचा भोपळा-1935 व लग्नाची बेडी-1936 ही त्यांपैकी काही लोकप्रिय नाटके होत. घराबाहेर-1934 व उद्याचा संसार-1936 ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत. त्या काळात विशेष अनुकरणीय ठरलेल्या इब्सेन या
नॉर्वेजियन नाटककाराचा संस्कार वरील दोन नाटकांवर झाल्याचे जाणवते.
अवकळलेल्या मराठी रंगभूमीचा लोकाश्रय टिकवून ठेवण्यात अत्र्यांची नाटके यशस्वी झाली. 1960 नंतरच्या दुसर्‍या कालखंडातील त्यांची महत्त्वाची नाटके म्हणजे तो मी नव्हेच-1962 व डॉक्टर-1967 ही होत. सत्यसृष्टीतील खळबळजनक घटनांवर ती आधारलेली आहेत. तंत्रदृष्ट्या प्रगत मराठी रंगभूमीचे दर्शनही त्यात घडते. वर्तमानकालीन अशा नाट्यात्म घटनांची अभिज्ञता अत्र्यांना स्वभावत: होती. या कालखंडातील अत्र्यांची लोकप्रिय नाटके पूर्वकालीन नाटकांच्या तुलनेने अधिक प्रत्यक्षदर्शी आहेत. मराठी रंगभूमीवरील अखंड प्रयोगशीलतेच्या व तीव्र स्पर्धेच्या या कालखंडातही त्यांची सर्वच नाटके लोकप्रिय ठरली.
त्यांचे कथात्मक साहित्य त्यांच्या विडंबन काव्यासारखे वा नाटकांसारखे प्रभावी ठरले नाही. विनोदी कथा लिहूनही विडंबन काव्याप्रमाणे अशा कथांची परंपरा मात्र त्यांना निर्माण करता आली नाही. त्यांचे चांगले कथात्मक साहित्य काहीसे गंभीर व वास्तवपूर्णच आहे. त्यात चांगुणा-1954 ही कादंबरी व बत्ताशी व इतर कथा-1954 यांचा समावेश होतो. विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्युलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके आदींचा समावेश होतो. महात्मा फुले-1958, पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त-1964, समाधीवरील अश्रू-1956, केल्याने देशाटन-1961, अत्रे उवाच-1937 ललित वाङ्मय-1944, हशा आणि टाळ्या-1958 ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत. त्यांच्या नवयुग वाचनमाला-1937 व सुभाष वाचनमाला-1962 यांनी विशेषत: पहिल्या मालेने-मराठी भाषा साहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला. अप्रकाशित गडकरी-1962 हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ अभ्यासनीय आहे. मी कसा झालो?-1953 हे त्यांचे वाङ्मयीन आत्मशोधन होय. कर्‍हेचे पाणी या पाच खंडांतील-1963, 1964, 1965, 1967 व 1968 विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा त्यांनी सांगितली आहे.
अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्र व्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासून-1940 ते 1962 झाला. 1943-1944 समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले. 1947-1948 या वर्षात जयहिंद नावाचे एक सायंदैनिकही त्यांनी चालविले. तुकाराम-1954 नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. सन 1956 मध्ये सुरू केलेल्या दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होते.
नाशिक येथे सन 1942 मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन बेळगाव-1955, दहावे मराठी पत्रकार-संमेलन-1950 आणि बडोदा, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्य संमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. वरळी (मुंबई) येथे ते 13 जून 1969 रोजी निधन पावले.

            कृष्णकुमार निकोडे     9423714883

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *