व्हॉटसअॅॅप आणि त्यावर बनत असलेल्या ग्रुपची क्रेझ कोरोना काळात खूपच वाढली होती. अनेकांनी संपूर्ण वेळ व्हॉटसअॅपला स्वाहा केला होता. आम्ही पण तापलेल्या तव्यावर भाकरी भाजत, राजेबहाद्दरवाड्यात भरत असलेल्या शिशुवृंद शाळेतील आमच्यासोबत शिकणार्या सगळ्या (1981 ची बॅच) मित्र-मैत्रिणींना शोधून ग्रुपमध्ये समाविष्ट केले. अगदी सातासमुद्रापार राहायला गेलेल्यांनादेखील. त्यामागील जिव्हाळ्याचे कारण म्हणजे, ‘ती’ सध्या काय करते! सगळे जाम खूश आमच्यावर, मग गप्पा, गोष्टी, ओळखपरेड, गेटटुगेदर असे सगळे सोपस्कार पार पाडत हा ग्रुप आता पाचव्या वर्षांत खेळीमेळीने पदार्पण करीत आहे. या ग्रुपचा एकत्र मेळावा नुकताच पार पडला. अन् यावेळी सर्वांनीच आपआपल्या आठवणींना उजाळा दिला.
कोरोना काळातील लावलेल्या वेलाचे रूपांतर बहारदार वृक्षात नक्कीच होणार, असे मनोमन वाटते आहे.
विशेष आणि कौतुकास्पद गोष्ट अशी की, या ग्रुपमधील नाशिकस्थित सदस्यांनी मागच्या वर्षीपासून दर संकष्ट चतुर्थीला एकत्र जमून गणपती अथर्वशीर्षची आवर्तनं करणे असा छोटेखानी कार्यक्रम चालू केला जेणेकरून सगळ्यांच्या भेटीगाठीही होत राहतील आणि याचं सर्व श्रेय जातं ते आमचा बालमित्र, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ सचिन वडनेरे यांना.
आडनावाप्रमाणेच त्यांनीही ‘वटवृक्ष’ रोपण केला आहे. तो जोमाने वाढणार यात शंकाच नाही. त्यास आता एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि हे औचित्य साधून या महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सगळ्यांनी मिळून सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम सोमवार पेठेतील सोनारवाड्यात सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्या कुटुंबासकट उत्साहात पार पाडला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी करण्यात सोमनाथ खंदारे, योगेश साक्रीकर, स्वप्ना लोखंडे, वैशाली कुलकर्णी, संध्या दुबे, मुक्ता शौचे, स्वाती वडनेरे, मनीषा मोरे, रूपाली देवरे, अॅड. एजन्सी संचालक/आर्टिस्ट अनिल कुलथे, राहुल घोलप, आर्किटेक्ट अजित घोडके, संजोग मदाने, आनंद शिंगणे, राजेश कलंत्री यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास डॉ. मेघा उपासनी, अनघा जोशी, लीना पुराणिक, बाळासाहेब कित्तूर, योगिता वैद्य-काटरे, वर्षा चव्हाण (बेळगाव), रत्ना गोखले, सुहास पोतनीस यांच्यासह सर्व मित्रपरिवार कुटुंबीयांसह असे शंभरहून अधिक जण उपस्थित होते. आजच्या पिढीला आमचा ‘राजेबहाद्दर ग्रुप’ नक्कीच एक आदर्श ठरेल.