गोदावरीत मिसळणारे दूषित पाणी थांबवण्याची मागणी

शिलापूर ः प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात दूषित पाणी मिसळत असल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याने जलचर प्राणी धोक्यात आले असून, नदीला पाणवेलींचा विळखा पडला आहे. गोदाकाठावरील गावांना डासांचा उपद्रव सतावत आहे. ठिकठिकाणी नदी फेसाळत असल्याने काश्मीरला आल्याचा भास होत आहे.
गोदाकाठावरील गावातील सरपंचांनी यापूर्वीच संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर सायखेडा, चांदोरी येथे काही प्रमाणात पाणीवेली हटविण्यात आल्या, परंतु पुन्हा परिस्थितीत जैसे थे झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजचे पाणी काही ठिकाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचा दावा गोदाकाठावरील सरपंचांनी केला आहे. त्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक वेळा मासेही मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे जलचर प्राण्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. जनावरे पाणी पित नाहीत. गोदाकाठावरील ग्रामस्थांनी हातपाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केल्यास अंगावर बारीक पुरळ उठते. नदी काठावरील विहिरींना हेच पाणी झिरपत असल्याने शेतमालावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच गावातील व वस्त्यांवरील ग्रामस्थ डासांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.
जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून, विशेषतः दुभत्या जनावरांचा यात समावेश आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. नाशिक तालुक्यातील गोदाकाठावरील सरपंच एकत्र येत काही महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन दिले, परंतु ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व सरपंचांनी एकत्र येत सोमवारी (दि.16) विभागीय आयुक्तांंना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार आहेत, असे सरपंच प्रिया पेखळे, नीलेश पेखळे यांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *