पुणे प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर दमदार हजेरी लावली असल्याने पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील जोरदार पाऊस सुरू आहे. राज्याच्या विविध भागांत म्हणजेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत येत्या दोन-तीन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कृष्णा व भीमा खोर्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचा जोर वाढला असून, खडकवासला धरण साखळीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदतच झाली आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सूनने महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीमचा काही भाग व्यापला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे शहर परिसरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील पावसाचा जोर वाढला असून, सखल भागात पाणी साचल्याने तसेच काही भागात रस्त्यांची कामे सुरू असून वाहतुकीस वेळ लागत आहे. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.