मनमाड जंक्शन रेल्वस्थानकावर ‘आरपीएफ’ची कारवाई
मनमाड : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमधील प्रमुख स्थानक असलेल्या मनमाड जंक्शन स्थानकावरील रेल्वे टीसींनी रेल्वेमधून फुकट प्रवास करणार्या प्रवाशांना दणका देत 2024 व जून 2025 पर्यंत 3000 पेक्षा जास्त
फुकट्यांकडून विनातिकीट तब्बल 24 लाख 55 हजार 682 रुपये दंड वसूल केला. रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ यांच्यामार्फत 144 केसेस केले आहेत. भविष्यात आणखीन कारवाई करून दंड वसूल करण्याचे काम सुरूच राहील, अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्यांमार्फत देण्यात आली. मुळात रेल्वेमार्फत वेटिंग तिकीट ही संकल्पना रद्द केल्याने विनातिकीट प्रवास करणार्यांचे प्रमाणदेखील कमी होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
भारतातील मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये प्रमुख स्थानक व भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे मनमाड जंक्शन स्थानकावर मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी अधिकार्यांकडून 2024 ते 2025 जूनपर्यंत विनातिकीट प्रवास करणार्या 3120 जणांवर दंडात्मक कारवाई केली.
त्यांच्याकडून तब्बल 24 लाख 55 हजार 682 रुपये दंड वसूल केला आहे. ज्या प्रवाशांनी दंड देण्यास नकार दिला, अशा प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ यांच्याद्वारे केसेस केल्या. यामध्ये 144 जणांवर केसेस दाखल केले आहे. मध्य रेल्वेतर्फे वेटिंग तिकीट ही संकल्पना रद्द केली असून, वेटिंग तिकीटच्या नावाखाली अनेक जण विनातिकीट प्रवास करत होते.
यासह अनेक फुकटे प्रवासीदेखील प्रवास करतात. यात 40 टक्क्यांपेक्षा जास्त संख्या ही रोज अपडाऊन करणार्यांची असते, अशा सर्वांकडून 24 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. मनमाड जंक्शन असून, या स्थानकावरून दिवसभरात दीडशेपेक्षा जास्त प्रवासी गाड्या ये- जा करतात. या गाड्यांमधून हजारो प्रवासी मनमाड स्थानकावरून ये-जा करतात, यातील अनेक प्रवासी फुकट प्रवास करतात अशा फुकट्यांना पकडून कारवाई करण्यात आली.
तिकीट असले तरच प्रवेश मिळणार?
भारतीय रेल्वेमार्फत प्रवाशांना विविध सुविधा देण्याचे काम सुरू असून, विमानतळावर जशा सुविधा मिळतात तशा सुविधा देण्याचे काम भारतीय रेल्वेमार्फत सुरू आहे. भारतातील अनेक रेल्वेस्थानके चारही बाजूंनी बंदिस्त असून, भविष्यात विमानतळावर तिकीट असेल तरच प्रवेश मिळेल, तशा पद्धतीवर काम सुरू आहे. रेल्वेचे बुकिंग तिकीट किंवा जनरल तिकीट घेतल्यानंतर रेल्वेस्थानकावर प्रवेश मिळेल, अशी सुविधा सुरू करण्याचा रेल्वेचा संकल्प असून, भविष्यात विमानतळासारखी तिकीट असली तरच प्रवेश मिळणार असल्याचे नियोजनात आहे.