निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे, ही निसर्गाकडे पाहण्याची स्वतंत्र आणि व्यापक दृष्टी अंगीकारणारे, अवघे जीवन पक्षी आणि निसर्ग अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे, व्यासंगी संशोधक, प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्या निधनाने आपण एका अरण्यऋषीस मुकलो आहोत. अनेक वृक्ष पावसाचे संकेत देतात. बहावा पूर्ण फुलला की पाऊस चांगला पडतो. बिब्याच्या झाडाला फुले लागली तर त्या भागात दुष्काळ पडतो. सावळा नावाच्या माशांच्या पोटातील अंडकोशावर पावसाच्या 9 नक्षत्रांच्या खुणा असतात. मूलत: त्यांचा रंग काळा असतो. तो तांबडा असेल तर पाऊस चांगला पडतो. दुष्काळ पडणार असेल तर वानरे खाल्लेली पाने, फळे, फुलांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून लाडू तयार करून ठेवतात. काटेरी झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधली तर त्या वर्षी दुष्काळ पडतो. याउलट आंबा, कडुनिंब यांसारख्या सदाहरित वृक्षांवर घरटी बांधली तर पाऊस चांगला पडतो. कावळ्याने तीन-चार अंडी घातली तर उत्तम पाऊस होतो. एक अंडे घातले तर अवर्षण पडते. हे सर्व ज्ञान या अरण्यऋषीने आपल्या निरीक्षणातून सिद्ध केले आहे. आपले व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. संस्कृत भाषा व साहित्य अध्यायनाबरोबरच जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने आपल्या व्यवसायाला अभ्यास विषयाशी जोडून घेत त्यांनी ऋषिवत जीवन व्यतित केले. जंगलाच्या सान्निध्यात झाडांच्या सहवासात आणि पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. 18 भाषा जाणणार्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव आपल्या 21 ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या अरण्यऋषीने एक लाख नवीन शब्दांचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करून दिला आहे. वन खात्यात 36 वर्षे सेवा. देशभर संशोधकवृत्तीने 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान अवगत करून आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन केले. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्यजीवन विशद करणारी 25 पुस्तके लिहिली. पक्षिजगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पक्षिकोशाची त्यांनी निर्मिती करून यात 450 पक्ष्यांची माहिती दिली आहे. पक्ष्यांची अठरा भाषांतील नावे दिली आहेत. ज्या पक्ष्यांची मराठी नावे आढळत नाहीत त्यांचे त्यांनी नव्याने नामकरण केले. प्राणिकोशात भारतातील 450 हून अधिक प्राण्यांची माहिती, छायाचित्रे, विविध भाषेतील नावे आहेत. वाघाचे प्रकार, बिबट्याची, हत्तीची वैशिष्ट्ये, वानराची शैली, उंदराचे 100 हून जास्त प्रकार, वटवाघळाच्या 150 हून जास्त प्रकाराची माहिती आहे. वृक्षकोशात महाराष्ट्रासह देशातील सुमारे 4000 वनस्पतींची नावे, त्यांची वनस्पतीशास्त्रीय मांडणी, त्यांची विशेष वैशिष्ट्ये आदी माहिती आहे. कडुनिंबाचे 8 प्रकार, बिबा, बहावा, मोह, साग आदींचे महत्त्व व त्यांच्याशी संबंधित रंजक माहिती अशी मांडणी आहे. मत्स्यकोशात खार्या पाण्यातील 450 आणि गोड्या पाण्यातील 250 मासे व त्यांची विविध नावे, वैशिष्ट्ये, रंजक माहिती यांचा समावेश आहे. सर्वांना केवळ खाण्यात येणार्या माशांविषयी माहिती आहे. यात सर्व प्रकारच्या माशांविषयी विस्तृत माहिती आहे. पक्षी जाय दिगंतरा (1983), जंगलाचं देणं (1985), रानवाटा (1991), शब्दांचं धन (1993), रातवा (1993), मृगपक्षिशास्त्र (1993), घरट्यापलीकडे (1995), पाखरमाया (2000), निसर्गवाचन (2000), सुवर्णगरुड (2000), आपल्या भारतातील साप (2000), आनंददायी बगळे (2002), निळावंती (2002), पक्षिकोश (2002), चैत्रपालवी (2004), केशराचा पाऊस (2005), चकवाचांदण : एक वनोपनिषद (2005), चित्रग्रीव (2006), जंगलाची दुनिया (2006), अप खपीीेंर्वीलींळेप ीें चीळसरिज्ञीहळीहरीीींर ेष करपीवर्शीं (2000), नवेगावबांधचे दिवस (2010) अशी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्य जीवनावरील अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली. ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ म्हणून त्यांना समीक्षकांनी गौरविले आहे.