पाऊस

पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन जीवनात, तर कुणाच्या मनावर कविप्रतिभेतून बरसू लागतो, तर काहींना तो पुस्तकातल्या पानांतून बाहेर पडून झाडांच्या पानांमधला पाऊस अनुभववासा वाटतो.

हलकेच जाग येते तेव्हा घराबाहेर झिम्माड, घनगर्द पावसाचा धिंगाणा सुरू असतो आणि इथे प्रत्येकाच्या मनात पाऊस घर करतो.
सृष्टीवर सर्वत्र सृजनांचा चमत्कार घडत असतो. नद्या, विहिरी, नाले पाण्याने तुडुंब भरतात. धरती विविधतेने नटलेली दिसते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित हा पाऊस करत असतो.
बाहेर पडणारा पाऊस आणि ती बाल्कनीतून बघते आहे. तिच्या शेजारी कुंडीत मोगरा फुलला आहे. जुई फुलली आहे. हिरव्यागार पानावर आणि शुभ्र फुलांवर पावसाचे थेंब! कितीतरी वेळ तिच्याकडे पाहतच राहावे.
सावन में लग गयी आग, टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगाईहे काही उगाच नाही..वाह.. क्या बात है..असे वाटू लागते.
हा पाऊस थांबूच नये.. धो धो कोसळतच राहावा..
असा हा निखळ आनंद देणारा पाऊस.
श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे..
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे..


पावसाचे दोन थेंब जरी पडले, तरी या दोन ओळी आपोआपच ओठांवर रुंजी घालू लागतात. शाळेत असताना तर भोलानाथाचं गाणं माझं आवडतं होतं. खास करून त्यातली दुसरी ओळ-
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?
ते रम्य बालपण, अवखळ वागणे, ते निरागस प्रश्न आणि निखळ आनंद देणारा तो पाऊस. झाडांना जशी नवी पालवी फुटते तशा या पावसात आठवणीही पुन्हा टवटवीत होतात. प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या काही कविता आम्हाला अभ्यासाला होत्या; पण एक साहित्यिक म्हणून मला त्यांचा प्रथम परिचय झाला तो त्यांनी केलेल्या महाकवी कालिदासांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या मराठी अनुवादातून.. त्यामुळे पाऊस म्हटल्यावर लहानपणीच्या माझ्या अल्लड खोड्या आणि नवसंवेदित मनांना भुरळ घालणारे मेघदूत यात रममाण झाल्याशिवाय मात्र कुणीच राहत नाही.
बरसात में मिले तुम सजन बरसात में
हा नर्गिंस-राज कपूरचा सिनेमा आजही मनाला त्या दिवसांत घेऊन जातो.
अशा समाधानी आणि खेळीमेळीच्या वृत्तीतून जरी पावसात भिजणे झाले तरी मनही तृप्त ओलेचिंब होतेच.
विराणी काव्यातून पाहिले तर विरहभावनेतली रचतेतून गडगडाट करणारा ढग आणि पैंजणासारखा रुणझुणता वारा, जणू श्रीकृष्णाची चाहूल घेऊन आले आहेत, असं त्या आठवणींच्या विरहात बुडालेल्या स्त्रीला वाटतं.
दर्पणी पहाता रूप, न दिसे वो आपुले,
बापरखुमादेवीवरे, मज ऐसे केले
पावसाच्या आठवणी मनात येऊन अशी मनाची अद्वैतावस्था प्रत्येकाच्याच मनात शेवटी प्राप्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *