सिन्नर ः प्रतिनिधी
आईसमवेत शेतातून घरी परतणार्या साडेतीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना तालुक्यातील गोंदे येथे शुक्रवारी (दि.20) संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. डोळ्यादेखत मुलीला बिबट्याने उचलून नेत ठार केल्याने आईने फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. जान्हवी सुरेश मेंगाळ (वय साडेतीन वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.
गोंदेफाटा शिवार आणि दातली बंधार्याजवळ वास्तव्यास असलेले शरद गोरख तांबे यांच्याकडे चास, ता.सिन्नर येथील रहिवाशी सुरेश मेंगाळ गेल्या 7 वर्षांपासून वाटेकरी आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची पत्नी व साडेतीन वर्षांची मुलगी जान्हवी आणि ठाणापाडा येथून नुकतेच आलेले काही मजुर शेतातील काम आटोपून घरी परतत असताना मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने आईच्या पाठीमागे चालत असलेल्या जान्हवीवर हल्ला चढवला आणि तीची मानगुट जबड्यात पकडून काही क्षणात शेजारील ज्वारीच्या शेतात दिसेनासा झाला. तिची आई आणि मजुरांनी आरडाओरड करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली व त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने जबड्यात धरलेली बालिकेला सोडून तेथून धूम ठोकली. जखमी अवस्थेतील जान्हवीला तातडीने रमेश तांबे, प्रकाश तांबे यांच्यासह मुलीचे आईवडील सिन्नर येथील खासगी रुग्णालयात घेऊन आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती.
बिबट्यांकडून बालके लक्ष्य
तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून पाळीव जनावरांवरील हल्ले नित्याचे झाले आहेत. तथापि माणसांवरही बिबटे हल्ले करत असून लहान बालकांना लक्ष्य करत असल्याचे गेल्या वर्ष-दीड वर्षातील घटनांवरुन दिसून येते. नऊ महिन्यांपूर्वी याच परिसरातील कुणाल रवींद्र तांबे या आठ वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. यासंदर्भात वनविभागाला अनेकदा मागणी करुनही पिंजरा लावला जात नसल्याने नागरिकांना बिबट्यांच्या दहशतीखाली जगावे लागत आहे.