लासलगावमध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनास सुरुवात
लासलगाव :- समीर पठाण
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) लासलगाव शाखा व एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी व निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शाखा कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली.
बँकेतून कर्ज घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून आरोग्य विम्यासाठी रक्कम कापली गेली,मात्र चार वर्ष उलटूनही विमा उतरवलेला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. २०२२ मध्ये SBIG आरोग्य प्लस विमा पॉलिसीसाठी ऑनलाईन रक्कम कपात झाली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खातेदारांना आरोग्य विम्याचे फायदे समजावून सांगितले होते, मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष विमा उतरवण्यात कंपनी अपयशी ठरली.
पीडित खातेदारांनी वारंवार बँक व इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधूनही २०२५ पर्यंतही पॉलिसी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित तातडीच्या परिस्थितीत विम्याअभावी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बँक व विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी व ग्राहक संभ्रमात असून आर्थिक संकटात सापडले आहेत.
“नावाजलेल्या बँकेच्या शाखेमध्ये जर ग्राहकांशी असा गैरव्यवहार होत असेल, तर सामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. इन्शुरन्स कंपनीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून पैसे जमा असूनही पॉलिसी न मिळाल्यामुळे हा प्रकार मोठ्या गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतो.
या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू झाले असून,खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलकांशी संपर्क साधून वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी स.पो.नि. भास्करराव शिंदे, माजी सभापती शिवा सुरासे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे, डॉ. विकास चांदर, सामाजिक कार्यकर्ते केशवभाऊ जाधव, संतोष पानगव्हाणे यांच्यासह इतर मान्यवरांनी आंदोलन स्थळाला भेट दिली.