वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास
निफाड : विशेष प्रतिनिधी
विजेची हानी तथा गळती, चोरी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर महावितरणसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महावितरणच्या अधिकार्यांना आहे. स्मार्ट मीटरमध्ये बरेच फीचर्स आहेत. त्यात ग्राहकांनी त्यांच्या मोबाइलवर महाविद्युत अॅप डाउनलोड केल्यास दिवसभरात किती वीज वापरली, याची माहिती मिळणार आहे. निफाड उपविभागात साडेतीन हजार ग्राहकांनी ते मीटर बसविले आहेत.
स्मार्ट मीटर बसविले जाणार नाही, त्याची सक्ती केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण देऊनही आता प्रत्येक वीजग्राहकाच्या घरात स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. या मीटरमध्ये छेडछाड केल्यास अधिकार्यांना कार्यालयात बसून समजणार आहे. त्या मीटरद्वारे महाविद्युत अॅप डाउनलोड केल्यास ग्राहकाने दररोज किंवा प्रत्येक तासाला किती वीज वापरली,हे त्यातून समजेल. याशिवाय प्रत्येक महिन्याला वीजग्राहकांच्या घरोघरी जाऊन मीटरचे रीडिंग घेण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे. कार्यालयात बसून अधिकार्यांना प्रत्येक ग्राहकाचे रीडिंग समजणार आहे. यामुळे रीडिंगमधील मानवी हस्तक्षेप किंवा चुका टळतील आणि ग्राहकांना वीजबिल अचूक जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनीच स्मार्ट मीटर बसवावे, असे आवाहनही अधिकार्यांनी केले आहे. एखाद्या ग्राहकाने दोन वीजबिले भरलीच नाहीत, तर महावितरणकडे जमा असलेल्या त्या ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून बिलाची रक्कम कपात केली जाणार आहे. पुढे तो ग्राहक पुन्हा थकबाकीत राहिला तर त्याला सुरक्षा ठेवीची रक्कम व त्या महिन्याचे बिल भरल्याशिवाय वीजकनेक्शन जोडून मिळणार नाही, असे वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे.
जुने मीटर काढून सर्वत्र नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम निफाडच्या ग्रामीण भागात सुरू आहे. काथरगाव, कुरुडगाव, सुंदरपूर, जळगाव, रामपूर, श्रीरामनगर, नैताळे, बोकडदरे आदी गावांत नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.आत्तापर्यंत वरील गावांत साधारणतः दोन हजार सातशे स्मार्ट मीटर यशस्वीरीत्या बसविण्यात आले आहेत. ग्राहकांना त्यांच्या वीज वापराचा तपशील रिअल टाइममध्ये बघता येईल. बिलांमध्ये कोणतीही
अंदाजाधारित रक्कम नसते. ग्राहकाला नेमके किती युनिट वीजवापर झाला ते स्पष्ट दिसते.
– हेमंत शिनकर, शाखा अभियंता, वीज वितरण कंपनी, निफाडनिफाड शहर व परिसरात महावितरणचे हजारो ग्राहक आहेत. त्या सर्वांना स्मार्ट मीटर बसवावे लागणार आहेत. सध्या साधारणतः तीन हजार पाचशे ग्राहकांना मीटर बसविण्यात आले आहेत. जेवढी वीज वापरली तेवढेच बिल येईल, अशी पारदर्शक यंत्रणा त्यात आहे.
– सुनील राऊत, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, निफाड