शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन; मालेगाव बाह्य, मध्यमध्ये प्रचंड घोळ
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेसह येत्या काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शिक व्हाव्यात, यासाठी मतदारयादीतील बोगस मतदार, दुबार व तिबार तसेच मृत झालेले मतदार वगळण्यात यावेत, अशी मागणी गुलाब पगारे, निखिल पवार, मदन गायकवाड, दीपक भोसले, विवेक वारुळे, सुरेश गवळी, मनोज पवार, सोमा गवळी, प्रवीण सोनवणे, निसार शेख, राजू आहिरे, तुषार ढिवरे, युवा गिते, संजय खरताळे, राजेंद्र शेलार, प्रताप पवार आदींच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव बाह्य व मध्य विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून, बोगस मतदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या सदोष मतदारयाद्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरल्यास निवडणूक पारदर्शक होणार नाहीत. मृत, विस्थापित, स्थलांतरित, एकापेक्षा अधिक नोंदणी असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करूनच मतदानासाठी याद्या वापरण्यात याव्यात. तरच निवडणूक पारदर्शकपणे पार पडेल. तसेच महापालिकेकडे मृत्यू झालेल्या लोकांची नावे जन्म व मृत्यू विभागाकडे आहेत, ती घेऊन मयत नोंद असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मालेगाव 115 विधानसभा क्षेत्राला 114 विधानसभा क्षेत्र जोडून असल्याकारणाने विधानसभा 114 चे काही प्रमाणात मतदान मालेगाव बाह्य विधानसभा 115 मधील मतदान क्षेत्रात समाविष्ट आहे. त्या दुबार, तिबार नावांचे पुरावे निवेदनासोबत आयुक्त जाधव यांना देण्यात आले.
यांनी केल्या होत्या तक्रारी
धुळे लोकसभा, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीच्यावेळी गुलाब पगारे, दीपाली वारुळे, बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव, माजी आमदार आसिफ शेख व अनेकांनी मतदार याद्यांमधील मृत, विस्थापित, एकापेक्षा अधिक नोंदणी असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्याबाबत तक्रारी दिल्या होत्या. त्याप्रमाणे केवळ अल्प प्रमाणात काही नावे वगळण्यात आली. मात्र, बरीच नावे वगळण्यात आली नाहीत. राजकीय दबावामुळे व बोगस मतदानासाठी ती नावे तशीच ठेवण्यात आलेली आहेत. याच विधानसभेच्या बोगस मतदारांची नावे असलेल्या याद्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत वापरल्या जाणार असल्याचे समजते. त्यास शिष्टमंडळाने हरकत
घेतली आहे.