पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी; उपर्यांना सिंहस्थाचा मेवा खाण्यात इंटरेस्ट
तपोवन हा नाशिकचा केवळ हिरवागार पट्टा नाही, तर प्रभू श्रीरामाचे वास्तव्य लाभलेला, अनेक ऋषिमुनींनी तपस्या केलेला आणि हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा जपणारा पवित्र प्रदेश आहे. नाशिककरांसाठी तपोवन हा शहराचा ऑक्सिजन झोन असून, धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने तो अभिमानाचा वारसा आहे. मात्र, याच तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी साधुग्रामम उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा प्रशासनाचा निर्णय उघडकीस आल्यानंतर खासदार वाजे यांनी शाब्दिकच नव्हे, तर दस्तऐवजी स्वरूपातही आक्रमक भूमिका घेतली आहे.
खासदार वाजे यांनी म्हटले की, नाशिकमध्ये मागील सर्व सिंहस्थ कुंभमेळ्यांचे आयोजन जागतिक मानकांनुसार झाले, तेव्हा कुठेही वृक्षतोड न करता सर्व सुविधा उभारण्यात आल्या. पर्यावरणाची, परंपरेची आणि भाविकांच्या भावनांची काटेकोरपणे काळजी घेतली गेली. यंदा व तेही तपोवनमध्येच वृक्षतोडीचा आग्रह कशासाठी, हा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघांनाही विचारला आहे. खा. वाजे पुढे म्हणतात, की हजारो एकर मोकळी, उपलब्ध, कमी संवेदनशील जमीन नाशिक जिल्ह्यात आहे. मग जाणीवपूर्वक तपोवनच निवडण्यामागे कोणता विचार? कोणते गणित? हा निर्णय श्रद्धास्थानांवरील थेट अन्याय आहे. खासदार वाजे यांनी तपोवनाला नाशिकचे
फुफ्फुस संबोधत वृक्षतोड म्हणजे शहराचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचे ठणकावले. तपोवन वाचवणे म्हणजे नाशिकचा श्वास, परंपरा व अस्मिता वाचवणे, असा त्यांचा संदेश राज्य सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री,पंतप्रधानांकडे या चार मागण्या
1. तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तत्काळ थांबवावी.
2. साधुग्रामासाठी पर्यायी जागेचे नियोजन करावे.
3. टेंडर आणि नियोजन प्रक्रियेची स्वायत्त चौकशी करावी.
4. कुंभमेळ्याचे सर्व नियोजन पर्यावरणपूरक आणि धार्मिक भावनांचा सन्मान करणारे असावे.