राम मंदिरावर मंगल ध्वजारोहण

उत्तर प्रदेशातील शरयू नदीकाठी भगवान श्रीरामाचा जन्म झाला होता. त्या पवित्र स्थळाला रामजन्मभूमी म्हणून ओळख आहे. याठिकाणी प्रभू रामाचे पुरातन मंदिर अस्तित्वात होते. सन 1528 मध्ये मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने ते प्राचीन राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधली होती. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी ती बाबरी रचना पाडली.
या घटनेनंतर परत प्रभू रामाच्या मंदिरासाठी अनेक दशकांच्या संघर्षानंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांती रामललाला विवादित जागा मिळाली. मंदिर निर्माणासाठी 25 फेब्रुवारी 2020 रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन झाला.
गेल्या 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन याठिकाणी भव्य मंदिर निर्माण सुरू झाले. उत्तर भारतीय पारंपरिक शैली असलेल्या नागरशैलीतील 380 फूट लांब, 250 फूट रुंद, तर 161 फूट उंची असलेले मंदिर निर्मितीने वेग घेतला. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या करकमलांनी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि त्या दिवसापासून हे मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्रीरामाची मूर्ती अरुण योगीराज (म्हैसूर) यांनी कोरलेली असून, ती 51 इंच काळ्या ग्रॅनाइटची शिलामूर्ती आहे. मंदिर तीन मजल्यांचे असून, त्यात एकूण 366 खांब समाविष्ट आहेत. गर्भगृहात बालरूप श्रीराम (रामलला) यांची मूर्ती आहे. मंदिराला पाच घुमट असून, यातील मुख्य घुमट रामांचा इतर स्वतंत्र घुमट सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे आहेत. 67 एकराचे एकूण क्षेत्र असलेल्या या भव्य परिसरात मंदिर परिसर, उद्यान, संग्रहालय, यात्री निवास आदी गोष्टी आहेत.
पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या या मंदिरात लोखंड किंवा स्टीलचा वापर नसून राजस्थानचा मकराना मार्बल आणि राजस्थान-कर्नाटकचे ग्रॅनाइट वापरले गेले आहे. मंदिरातील भव्य भिंतींवर देवी-देवतांचे सुंदर कोरीवकाम केलेले आहे. मंदिर परिसरात 70 हजार झाडे लावली जाणार आहेत.
या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले. शतकांच्या तपश्चर्येनंतर ध्वजारोहणाचा दिवस उगवला. रामललाच्या मंदिर शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक आणि खास कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सजली होती. हा भगवा ध्वज तब्बल 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असल्याचे सांगितले जाते.
अयोध्येत रामललाच्या दर्शनार्थ दररोज एक ते दोन लाख भाविक येतात, तर मोठ्या सणांना ही संख्या पाच ते दहा लाखांपर्यंत जाते. सदर राममंदिर केवळ धार्मिक स्थळच नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक मानला जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *