अखेर त्यांचं जमलं… ठाकरे बंधूंची मुंबईत युती

अखेर त्यांचं जमलं
ठाकरे बंधूंची मुंबईत युती

मुंबई (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे ) यांच्यातील युतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. जागावाटपाचा कळीचा मुद्दाही यशस्वीपणे निकाली काढण्यात आला आहे.

‘मातोश्री’वर खलबते

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी सुमारे अडीच तास महत्त्वाची बैठक पार पडली, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. विशेषतः दादर, शिवडी, वरळी आणि मुलुंड यांसारख्या मराठी बहुल भागांतील जागांवरून दोन्ही पक्षांत असलेला पेच आता सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील, असेही सांगण्यात आले.
महाविकास आघाडीचा विस्तार?

या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षालाही सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते. जर हे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर मुंबईच्या निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.ठाकरे बंधूंच्या या नव्या ‘केमिस्ट्री’मुळे मुंबईच्या सत्तेची चावी कुणाकडे जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *