साने गुरुजींचे अद्वितीय समाजकार्य

महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणारे, जीवनभर फक्त खादीचा उपयोग करणारे आणि ’खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे जगाला समजावून सांगणारे आदर्श व गुणवंत शिक्षक साने गुरुजी अर्थात, पांडुरंग सदाशिव साने यांची आज, 24 डिसेंबरला 126 वी जयंती आहे. गांधीवादी विचारसरणीचे थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, महान विचारवंत, आदर्श शिक्षक आणि प्रतिभावंत साहित्यिक साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने व आईचे नाव यशोदाबाई होते.
’श्यामची आई’ या आत्मचरित्रातून साने गुरुजी यांनी आपला जीवनपट उलगडून सांगितला आहे. श्याम स्वभावाने फार हट्टी असतो. एखादी गोष्ट करायचे ठरवले की, श्याम ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत असे. मात्र, श्यामची आई तितकीच करारी आणि संस्कारांचे विद्यापीठ असते. श्यामवर योग्यवेळी योग्य संस्कार रुजवून श्यामच्या आईने श्यामला म्हणजे साने गुरुजी यांना एक सुहृदयी, हळवी व भावनिक व्यक्ती म्हणून घडविले. शिक्षणात कुशाग्र बुद्धीचा उपयोग करून अत्यंत चिकाटीने अभ्यास करून श्यामने त्या काळात इंग्रजी विषयात एम.ए.ची पदवी संपादन केली.
शिक्षणानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये 1924 ते 1930 अशी सहा वर्षे शिक्षकांची नोकरी केली. तेथील वसतिगृहाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा उपयोग करून घेतला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ’श्यामची आई’ ही कांदबरी सांगून व स्वतः तसे आदर्श जीवन जगत विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी दिली. आपल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती हा भाव शिकवला.1928 मध्ये त्यांनी ’विद्यार्थी’ हे मासिक लिहायला सुरुवात केली.
महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन 1930 मध्ये साने गुरुजी यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि सविनय कायदेभंग आंदोलनात सहभाग घेतला. गांधीजींचा केवळ स्वदेशी वस्तू वापरा हा संदेश ऐकल्यावर त्यांनी खादी वस्तूंचा वापर सुरू केला. ’काँग्रेस’ हे साप्ताहिक सुरू केले, तसेच त्यांनी पत्री या काव्यसंग्रहातून देशभक्तीचा संदेश देणार्‍या अनेक कविता लिहिल्या.
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो आणि खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची काव्ये अजरामर झाली आहेत. भारतीय संस्कृती, तीन मुले, मोलकरीण व श्यामची आई अशी अनेक दर्जेदार पुस्तके त्यांनी लिहिली. समाजकार्याला वाहून घेण्यासाठी त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी निःसंकोचपणे मैला वाहणे, गावे स्वच्छ करणे, शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे ही कामे त्यांनी आवडीने केली.
1942 च्या चले जाव चळवळीत भूमिगत राहून साने गुरुजींंनी भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगत ते स्वातंत्र्याचा लढा हिरिरीने लढले.त्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. 1946 मध्ये पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर मागासवर्गीयांना खुले व्हावे म्हणून बेमुदत उपोषण केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंतरभारती चळवळ सुरू करून भारत जोडण्याचे प्रभावी कार्य केले.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात, साने गुरुजी यांनी शिक्षक, लेखक, कवी, विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक या नात्याने जे भरीव कार्य केले आहे ते अलौकिक, लक्षणीय, वंदनीय व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. ते मातृहृदयी, हळवे व मृदू स्वभावाचे विचारवंत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरभारतीय जनता सुखी होईल, असा त्यांना विश्वास होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात फोफावत जाणारी विषमता पाहून त्यांचा पूर्णतः भ्रमनिरास झाला. अशा अवस्थेत त्यांनी शेवटपर्यंत भारत जोडो चळवळ नेटाने चालवली. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक संस्कारांची खाण आहे. हे पुस्तक घरोघरी आवडीने वाचले जाते. त्यांनी लिहिलेली प्रार्थना ’खरा तो एकचि धर्म…’ प्रत्येक शाळेत गायिली जाते. आज जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याला विनम्र अभिवादन!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *