मुंबई :
महाराष्ट्राचे लाडके दादा आणि राज्याच्या विकासाचं व्हिजन बाळगून राजकारण करणार्या अजित पवार यांचे बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामती येथील विमान दुर्घटनेत निधन झाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी अजित पवारांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिल्लीतच ही बातमी समजली. त्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसह तत्काळ बारामतीकडे परतले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी दु:खद घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. कातरलेल्या आवाजात, डोळ्यातील पाणी डोळ्यातच साठवत शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, हा केवळ अपघात आहे, याच्यात राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांवर हा मोठा आघात झाला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ता धाय मोकलून रडत आहे, तर बारामती आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांनी बंद पाळून आपला शोक व्यक्त केला.
हा अपघाती मृत्यू महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झालं ते भरुन निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात यामागे काही राजकारण आहे अशाप्रकारची भूमिका मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करुन इथं राजकारण आणू नये, अशा शब्दात शरद पवारांनी अपघातावर प्रतिक्रिया दिली.
Ajit, Maharashtra has lost its decision-making ability: Sharad Pawar