शौर्याचा इतिहास अन् आजचे वास्तव

फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला,
रात्रीचा इतिहास चांदण्यानी लिहिला, आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण, आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला.
शब्दांची साधना करणार्‍या लेखिकेला शिवरायांसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर लिहिण्याचा मान मिळणे, यापेक्षा मोठं सौभाग्य दुसरं नाही.
19 फेब्रुवारी 1630 हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला, कारण या दिवशी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.हा फक्त एका राजाचा जन्म नव्हता, तर अन्यायाविरुद्ध उभ्या राहणार्‍या स्वराज्याच्या संकल्पनेचा जन्म होता. ज्याला जग आजही छत्रपती शिवाजी महाराज या नावाने वंदन करते. महाराजांची जयंती ही केवळ उत्सव नसून, ती प्रेरणेचा दीप आहे. या दिवशी आपण त्यांच्या शौर्य, न्यायप्रियता आणि स्वाभिमानाच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया. त्यांच्या आदर्शांचा मार्ग धरून समाजासाठी चांगले कार्य करणे, हाच त्यांना खरा मानाचा
मुजरा ठरेल.
19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे, कारण याच दिवशी इ.स. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन यामुळे बालपणापासूनच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजले.
शिवाजी महाराजांनी अत्यंत धैर्य, शौर्य आणि चातुर्य यांच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी अनेक किल्ले जिंकले, शत्रूंवर विजय मिळवला आणि आपल्या प्रजेचे रक्षण केले. ते केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेले आदर्श राजा होय. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, सर्व धर्मांचा आदर केला आणि प्रशासनात शिस्त व प्रामाणिकपणा ठेवला.
शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य, स्वाभिमान आणि देशप्रेम शिकवते. त्यांच्या कार्यामुळे मराठी माणसाला स्वराज्याची जाणीव झाली. त्यामुळेच त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्यांच्या कार्याची आठवण करून दिली जाते. जिजाऊंच्या संस्कारांनी प्रेरित होऊन त्यांनी शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. ते न्यायप्रिय, धैर्यवान आणि प्रजेसाठी तत्पर होते.
शौर्याची गाथा इतिहासात नाही, रक्तात वाहिली पाहिजे,
शिवरायांची प्रेरणा शब्दांत नव्हे, कृतीत दिसली पाहिजे.
गड-किल्ल्यांच्या दगडांत आजही त्यांचीच शपथ दडलेली,
प्रत्येक तरुणात स्वराज्याची ज्योत पेटली पाहिजे.
राजे, तुमची तलवार नाही आज हातात, पण आठवणींचा ज्वालामुखी अजून पेटतोय छातीत. धैर्य, स्वाभिमान, आज डोळ्यात पाणी आहे, तुमच्या कार्याची जाणीव आहे. तरुणाईला जागवून गुन्हेगारी संपवायला महाराज, तुमची गरज आहे. ही प्रत्येक तरुणांची हाक आहे, म्हणूनच या मातीत पुन्हा तुमच्या जन्माची आस आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या आदर्शांमधून आपण धैर्य, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान शिकायला हवा. आजच्या तरुणांनी संस्कार देश सेवा गडकिल्ल्यांचे संरक्षण केले पाहिजे, गडकिल्ले हे आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहे. संस्कार आणि देशसेवा यांना प्राधान्य द्यावे. गड-किल्ले हे आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांचे जतन व स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे. इतिहासाचा अभिमान बाळगून समाजासाठी चांगले कार्य करणे, स्त्रियांचा सन्मान राखणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे, हेच खरे शिवरायांच्या विचारांचे पालन होय.
शिवरायांचा आदर्श घेऊन चांगला नागरिक बनणे, हाच आजच्या पिढीचा खरा धर्म आहे. चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनणे, हेच महाराजांना सर्वांत मोठे अभिमान वाटण्यासारखे कार्य आहे.
सत्य व प्रामाणिकपणाने वागणे, स्त्रियांचा सन्मान राखणे, गड-किल्ल्यांचे जतन करणे, देशप्रेम व समाजसेवा करणे, अन्याय व भ्रष्टाचाराला विरोध कारणे हे मूल्य अंगीकारणे म्हणजे महाराजांना आपल्या कार्यातून जिवंत ठेवणे. शिवरायांचा आदर्श जगणारा प्रत्येक नागरिकच त्यांच्या स्वप्नातील स्वराज्य घडवतो. स्वराज्याचा दीप तेव्हाच तेजाने पेटतो, जेव्हा आपण शिवरायांचे संस्कार आणि आदर्श समोर ठेवून जगतो. शिवरायांचे नाव घेणे सोपे आहे, पण त्यांच्या विचारांप्रमाणे जगणे हीच खरी परीक्षा आहे. ज्या दिवशी प्रत्येक तरुणात शिवरायांचे धैर्य जागेल, त्या दिवशी खरे स्वराज्य साकारेल.
इतिहासात अनेक पराक्रम नोंदले गेले, पण अफजलखानाशी झालेली भेट ही शिवरायांच्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीचे सर्वोत्तम उदाहरण ठरते. हा प्रसंग केवळ युद्धातील विजय नव्हता, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि संकटातही धैर्य न सोडण्याची शिकवण देणारा होता. अशा असंख्य पराक्रमांमुळे महाराज इतिहासात अजरामर झाले आणि जनतेच्या हृदयावर राज्य करू लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, ते आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नसून, ते प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत. त्यांचे पालन करून देशासाठी आणि समाजासाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

The history of bravery and today’s reality

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *