खासदार वाजेंकडून अधिकार्यांची कानउघाडणी; जलवाहिनी दुरुस्तीला विलंब, वीजबिलही थकीत
सिन्नर : प्रतिनिधी
मनेगावसह 22 गावांची पाणीपुरवठा योजना गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. लासलगाव-इगतपुरी रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटल्याने ही योजना ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी अधिकार्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले.
दापूर ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे मनेगावसह 22 गावांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. या प्रश्नावर सिन्नर तहसील कार्यालयात मंगळवारी (दि. 24) आढावा बैठक घेण्यात आली.
‘चार महिन्यांपूर्वीच बैठक झाली होती. तरीही पाइपलाइन दुरुस्त का झाली नाही? गावांना पाणी नाही आणि रस्त्याचे काम सुरू आहे, ही बाब गंभीर आहे,’ असा सवाल करत खा. वाजे यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने जलवाहिनी दुरुस्त करून चाचणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या योजनेचे थकीत वीजबिल त्वरित भरावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
अधिकार्यांतील समन्वयाच्या अभावामुळे काम रखडल्याचा आरोप करत खा. वाजे यांनी संबंधित विभागांना धारेवर धरले. ‘गावकर्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ही अवस्था खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. बैठकीला तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपकार्यकारी अभियंता श्रद्धा मोरे, पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता अंकित जाधव, योजनेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, सचिव विलास सांगळे, भोकणीचे सरपंच अरुण वाघ, सामाजिक कार्यकर्ते राजाराम मुरकुटे, तसेच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीनंतर प्रशासनाने काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे खासदार वाजे यांनी स्पष्ट केले.
‘माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल’
पाइपलाइन दुरुस्ती व वीजबिल भरल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू ठेवू नये. अन्यथा स्वतः जाऊन काम बंद पाडू. त्यासाठी माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असा इशारा खासदार वाजे यांनी दिला. आठ दिवसांपूर्वी निघालेल्या ‘हंडा मोर्चा’नंतरही प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Water supply to 22 villages has been disrupted for four months