धर्मांतर झालेल्या दीड लाखावर कुटुंबांची घरवापसी

नरेंद्र महाराज ः धर्मांतर रोखण्यासाठी अध्यात्म व विज्ञानाची सांगड आवश्यक

नाशिक : प्रतिनिधी
अज्ञान, अंधश्रद्धा आणि गरिबीचा फायदा घेऊन धर्मांतर केलेल्या राज्यातील एक लाख 54 हजार 455 कुटुंबांची घरवापसी आपण आतापर्यंत केली आहे. त्यांचे मंत्रोपचाराने शुद्धीकरण करून हिंदू धर्मात पुन्हा प्रविष्ट केले. हिंदू संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचे काम आपण सनातन जागृती मेळाव्यांतून करीत आहोत, अशी माहिती जगद्गुरू नरेंद्र महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील गोल्फ क्लब मैदानावर नरेंद्र महाराज यांचा धर्मजागृती मेळावा सुरू आहे. त्यानिमित्त ते येथे आले आहेत. प्रवचनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड महत्त्वाची आहे. मात्र, अध्यात्मासोबत अनेक जण भूलथापांना बळी पडतात. अंधश्रद्धेच्या आहारी जातात. ते प्रमाण वाढले आहे. याच अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन काही धर्मसंस्था धर्मांतर घडवून आणत आहेत. महाराष्ट्रातील विशेषत: आदिवासी भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यावर विचार करण्याची गरज आहे. आपण सनातन मार्गाने धर्मशास्त्र, संस्कार आणि धार्मिक कार्य करीत जागृतीचे काम करीत आहोत. गेल्या काही वर्षार्ंत गोव्यात हिंदू मंदिराच्या ठिकाणी चर्च बांधला होता. त्या ठिकाणी नुकतेच शंकराचे दगडी मंदिर उभारून शुद्धीकरण केले. गोव्यात 300 कुटुंबे परत हिंदू धर्मात आली. नागपूरला 500 कुटुंबे, छत्तीसगडमध्ये 200 व नाशिक येथे शुक्रवारी (दि. 27) 255 कुटुंबांची घरवापसी करून घेतली. आतापर्यंत एक लाख 54 हजार 555 कुटुंबांची घरवापसी झाली.
ते पुढे म्हणाले की, धर्मांतराचे सुप्त राजकारण सुरू आहे. हिंदू धर्माला संपवण्याचे काटकारस्थान सुरू आहे. मोदी सरकार आल्यापासून त्यात फरक पडला आहे. त्याला अजून गती देण्याची गरज आहे. धर्मात ठेकेदार तयार झाले आहेत. स्वत:च्या लाभासाठी अज्ञानी, गरीब व गरजू लोकांचे धर्मांतर घडवून आणले जात आहे. त्यात शिक्षणाचाही प्रश्न आहे. आता इंग्रजी माध्यमाचा शाळा वाढल्या आहेत. त्यांचे शुल्क भरमसाट आहे. सामान्य कुटुंब ते भरू शकत नाही. मुलांच्या शिक्षणाच्या आमिषाने ते धर्मांतराला बळी पडतात. त्यामुळे शासनानेच इंग्रजी शाळांना अनुदान द्यावे म्हणजे गरिबाचा मुलगाही इंग्रजी माध्यमाचा शाळेत शिकू शकेल. त्यात वेद, विज्ञान, संस्कृती शिकवली गेली पाहिजे. बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून संस्कार दिले गेले पाहिजेत.
राज्य शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा कडक केल्याचे समजते. चांगला निर्णय घेतला आहे. त्याबद्दल शासनाचे सनातन परिवारातर्फे अभिनंदन करतो. गायीला राष्ट्रीय मातेचा दर्जा मिळाला पाहिजे, या मागणीसोबतच हिंदू कुटुंबांनी किमान हम दो हमारे दो चे धोरण अवलंबले पाहिजे. अन्यथा एकाच मुलावर थांबणार असाल तर भविष्यात हिंदू धर्म अल्पसंख्याकांच्या रांगेत येईल, असे मत नरेंद्र महाराज यांनी व्यक्त केले.

 

 

Over 1.5 lakh converted families return home

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *