नाशिक : प्रतिनिधी
परंपरेनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला होळी साजरी करण्यात येते. होळीच्या दिवशी होलिका दहन करत वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात करत नवीन सुरुवात करण्यात आली. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ म्हणत शहरात उत्साहात होळी सण साजरा करण्यात
येणार आहे.
संध्याकाळच्या वेळी होळी पेटवत होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. तसेच होळीत नारळाची आहुती देण्यात येते. होळीत भाजलेल्या खोबर्याचा प्रसाद वाटप करण्यात येतो. होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याचीही प्रथा आहे. शहरात आज ठिकठिकाणी सार्वजनिक होळी पेटविण्यात येणार आहे. संस्था, संघटनांसह सोसायटीत एकत्र येत होलिका उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मराठी वर्षातला शेवटचा सण असल्याने होळी सणाला विशेष महत्त्व आहे. बाजारपेठेत गोवर्या, हार-कडे विक्रीसाठी आले
आहेत.
शुभ मुहूर्त
2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर होलिका दहनाचा मुहूर्त सुरू होईल, जो मध्यरात्रीपर्यंत राहील. परंपरेनुसार, संध्याकाळी सूर्य मावळताना होळीची पूजा करतात आणि त्यानंतर होळी पेटवतात. यानुसार, होळी पेटवण्याचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजता सुरू होत आहे आणि रात्री सुमारे 12 वाजेपर्यंत राहील. या काळात भद्रेचा अशुभ काळही नसेल.
असे आहे होळीचे महत्त्व
धर्मग्रंथानुसार, प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. त्यामुळे भक्त प्रल्हादचे वडील राक्षस हिरण्यकश्यप खूप नाराज होते आणि ते भगवान विष्णूंना आपला शत्रू मानत होते. पण, प्रल्हाद भगवान विष्णूंच्या भक्तीत नेहमी मग्न असायचा. एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहीण होलिकाला आज्ञा केली की, तिने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून मरेल. पण असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की, ती अग्नीत जळू शकत नाही, पण जेव्हा होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि होलिका दगावते. तेव्हापासून होलिका दहनाची प्रथा सुरू झाली.