चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावर शुक्रवारी सायंकाळी 5.50 वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूरहून नाशिककडे येणार्या नाशिक आगाराच्या बसला अचानक टोलनाक्यावर आग लागल्याची घटना घडली. चालक विलास चोले यांच्या लक्षात ही बाब येताच प्रसंगावधान राखत बसमधील प्रवासी सुखरूप बाहेर काढले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व 15 प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एसटी बस सोलापूरहून नाशिककडे जात असताना शिंदे टोलनाक्यावर अचानक बसच्या इंजिनच्या पुढील भागातून धूर निघू लागला. परिस्थिती लक्षात येताच चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणांतच बसने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे भागातील महामंडळाची बस पेटल्याची ही दुसरी घटना आहे. मागील दोन-तीन वर्षांपूर्वीदेखील अशाच प्रकारे एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली होती. या कालच्या घटनेने पळसेजवळील घटनेसह मिर्ची हॉटेल नाशिकमधील बस पेटल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. राज्य परिवहन महामंडळाने ज्या नादुरुस्त अथवा खराब बस आहेत, त्या व्यवस्थित दुरुस्त करूनच रस्त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी सोडायला हव्यात, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व वाहतूक शाखेचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
शिंदेत दोन दिवसांत दुसरी घटना
शिंदे गावात दोन दिवसांपूर्वी एका प्लास्टिक कंपनीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना ताजी असतानाच, दुसर्या दिवशी टोलनाक्यावर बस पेटल्याची घटना घडली. औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनाने आग विझविण्यासाठी एखादा पाण्याचा बंब घेऊन प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
टोलवेज कंपनीकडून सुविधांचा अभाव
नाशिक-सिन्नर टोलवेज कंपनी केवळ टोलवसुलीत मग्न असून, फक्त वाहनधारकांचे अधिकचे आर्थिक शोषणच कंपनी करते की काय, अशी चर्चा सध्या नागरिकांत आहे. अशा काही आगीच्या घटना भविष्यात घडू नये, मात्र अचानक घडली तर साधे आग विझविण्यासाठी पूरक पाण्याचे बंबदेखील टोल व्यवस्थापनाकडे नाही. केवळ टोलवसुली एवढे एकच टार्गेट असेल व वाहनधारकांची कोणतीही काळजी नसेल तर टोल प्रशासनावरती कारवाई का होत नाही, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ST bus catches fire at Shinde toll plaza