सकारात्मक भावनेची जाणीव- चंद्र अमृताची गोडी

जगी शोधून मिळेना, कशी खोदून मिळेना
कणाकणांत मातीच्या, खोल पेरुनी उगेना…
अशा शब्दांत आईच्या मायेला पारखा झालेल्या लेकराच्या मनातील भावनांना शब्दबद्ध केलेला कवी संजय बन्सल लिखित ’चंद्र अमृताची गोडी’ हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या अर्थाने ज्याच्या नावातच ईश्वराचा आत्मा आहे अशा आई या व्यक्तिमत्त्वाला वाहिलेला हा दीर्घ काव्याचा एक अनोखा प्रयोग यानिमित्ताने वाचायला मिळाला. या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावरून कवीने गुंफलेल्या शब्दांना अमृताची गोडी लागली आहे.
कोणतीही साहित्य कलाकृती वाचायला घेतली तर सर्वार्ंत आधी त्या साहित्य कलाकृतीचे मुखपृष्ठ आपल्याला काय सूचित करीत आहे, हे तपासणे आवश्यक आहे. चंद्र अमृताची गोडी या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाकडे बारकाईने पाहिल्यावर काही संदर्भांच्या नोंदी घेणे आवश्यक वाटले. या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर झाडाच्या फांदीला हाताच्या ओंजळीसारखे दाखवून त्यात एक घरटे दाखवले आहे आणि या घरट्यात पाच पिलांना चोचीने अन्न भरविताना त्यांची आई दाखवली आहे. मुखपृष्ठावर पाश्वर्र्भागात हळदुल्या पिवळ्या रंगात सूर्य दाखवला आहे, असा संदर्भ या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर आपल्याला पाहावयास मिळतो. यावरून या संग्रहाचे साहित्यिक मूल्य आपण जाणून घेणार आहोत.
चंद्र अमृताची गोडी या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर हाताच्या ओंजळीसारखी झाडाची फांदी दाखवली आहे. ही फांदी म्हणजे कुटुंबाचा मुख्य आधार आहे आणि हाताची ओंजळ करून या घरट्याला म्हणजेच कुटुंबाला मायेने, प्रेमाने अलगद उचलून धरले आहे. यातून सुरक्षिततेची भावना व्यक्त केली आहे. ज्या घरात आईचा सहवास त्या घरात प्रेम, जिव्हाळा, माया, ममता सुरक्षित राहते. आई सर्वांना जे ओंजळीत येईल ते सुख देत राहते. मात्र, स्वतःची ओंजळ नेहमी इतरांना देऊन मोकळीच ठेवते. स्वतःला काहीच ठेवत नाही आणि हीच भावना व्यक्त करताना कवी लिहितात की,
माय कुटुंबीय घर, आदर स्वागती कर.
भाव-भावार्थ, हळवा पंखनयनी पाझर,
कंठ आभाळ दाटता, ओली रीतीच ओंजळी.
चंद्र अमृताची गोडी या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर असलेल्या घरट्यात पक्षी आपल्या पाच पिलांना अन्नाचा घास भरवत आहे, हा संदर्भ मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय गर्भित अर्थाने रेखाटला आहे. पाच पिल्लं म्हणजे कुटुंबातील कष्ट, आशा, अपेक्षा, सहनशीलता आणि समाधान अशा पाच गोष्टी आहेत, कुटुंबात सर्वांनी कष्टाला महत्त्व दिले पाहिजे. त्यातून उद्या आपले चांगलेच होणार आहे हा आशावाद मनात ठेवून आपल्याला सुख मिळेल ही अपेक्षेने सहनशीलता ठेवली तर समाधान नक्कीच मिळेल, या भावनेने हे पाच पिल्लं रेखाटली असावीत, असे मला वाटते, तर चोच उघडी ठेवून अन्नासाठी वाट पाहत असलेली पिल्लं हे उद्याच्या नव्या भावी पिढीचे प्रतीक असून, उघडी चोच हे त्याच्या भुकेचे प्रतीक आहे, भविष्याकडे आशावादी भावनेने चोच उघडून पाहत आहेत, ही भावना मनाला हळवी करून गेली. आईची मुलांसाठी चोचीत दाणा आणून भरवणे ही भावनाच उदात्तपणाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच कवी लिहितीत की,
माय मातीतला गंध, रानी वनस्पती कंद
पंख, चोचीतला दाणा खेळ, लेकरांचा छंद
माय धावतच येते लेक छातीशी ती घेते
चिवचिव पाखरांची ओठ दुधाकडे नेते…
चंद्र अमृताची गोडी या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर दाखवलेला हळदुला पिवळा रंग हा मानवी जीवनातील सकारात्मकतेची जाणीव करून देतो, तर उगवत्या सूर्याच्या कोवळ्या हलक्या प्रकाश लहरी आयुष्यातील नवे चैतन्य, नवा दिवस, नवा उत्साह व्यक्त करतात. आई ही कुटुंबात प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मकता आणत असते, प्रत्येकाला नवे चैतन्य बहाल करीत असते, नवा उत्साह देत असते हीच भावना व्यक्त करतांना कवी लिहितात की, माय हळद पिवळी, तेज तेजस सावली.
शिंपे किरण फुलोरा, दारी ऊन रे कोवळी…
कवी संजय बन्सल यांच्या चंद्र अमृताची गोडी कवितासंग्रहातील सर्वच कविता माय या एकाच केंद्रबिंदूभोवती वलयांकित झालेल्या असून, कोणत्याही कवितेला शीर्षक दिलेले नाही. प्रत्येक कवितेत आठ ओळी घेऊन प्रत्येक कविता अष्टाक्षरी या प्रकारात शब्दबद्ध केली आहे.
माय मशाल क्रांतीची, सावू-जोती पणतीची.
प्रज्ञा शील नि करुणा, बुद्धवंदना शांतीची.
अशा सामाजिक जाणिवेने प्रेरित कवितेने शेवट केलेल्या संग्रहाला, क्रांतीची प्रयोगशाळा आणि मायपणाची पौर्णिमा अशा शब्दात प्रशंसा करून, कवी यशवंत मनोहर यांनी केलेली प्रस्तावना नव्या पिढीच्या कवींना उभारी देणारी आहे.
संजय बन्सल यांची रचना शब्दप्रतीकाची प्रतिमासृष्टी, चिंतनशील भावाभिव्यक्ती, छंदात्म पद्यबंधाचा साज आणि सुरावटलेली नादमयता या संयोगप्रीतीतून ‘माय’च्या ममत्वाची विश्वात्मक धून निर्माण करते अशा अभ्यासपूर्ण शब्दात प्रसिद्ध ब्लर्बकार प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी दिलेले ब्लर्ब संग्रहाला नवे बळ देणारे आहे तर साहित्यिक लोकनाथ यशवंत यांच्या शुभेच्छा कवीला प्रेरणादायी आहेत. नव्या प्रयोगात्मक कलाकृतीला आपल्या नावाचा ठसा देवून नाशिकचे ठसा प्रकाशन गृह यांनी प्रकाशन करून या कलाकृतीचा साहित्याच्या प्रांतात ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार सरदार जाधव यांनी दोन बोटांनी कुंचल्याला धरून रंगबद्ध केलेले मुखपृष्ठ आणि बुद्धभूषण साळवे यांनी रेखाटलेली रेखाचित्रे वाचकाला मोहित करणारी आहेत.

Awareness of positive emotions – the sweetness of the moon nectar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *