आवारे यांच्या आत्मचरित्रात भोंदू खरात चक्क सिद्ध पुरुष!

नाशिक : प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात याच्या सोबत छायाचित्रात दिसणार्‍या शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नामकर्ण आवारे यांच्याबद्दल उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता नामकर्ण आवारे यांनी लिहिलेले पुस्तकही चर्चेत आले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात अशोक खरात हे अद्भुत आणि चमत्कारिक पुरुष असल्याचा दावा केला आहे. मागील तीन वर्षांपासून आवारे यांनी शिवनिका संस्थानपासून स्वत:ला दूर केले होते. परंतु आता त्यांच्या पुस्तकातील दाव्यांमुळे आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपामुळे आवारे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. 2012 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात नामकर्ण यांनी खरातवर तब्बल 13 पाने खर्ची घातली आहेत. सिद्ध पुरुषांच्या सहवासात या शीर्षकाखाली खरात यांच्यासोबतच्या अनुभवांचे वर्णन या पुस्तकात आहे.
1999 साली विधानसभेचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारादरम्यान वाद झाल्याने सिन्नर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला आणि हा वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असताना अशोक खरात पहिल्यांदा भेटले. त्यावेळी पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यावर अशोक खरात यांनी स्वतःहून माझ्यासह इतर पाच -सहा जणांना तुम्ही कोकाटे चे कार्यकर्ते आहात का, हा प्रश्न केला. त्याचवेळी ’काही काळजी करू नका, माणिकराव साधारण 23 हजार 450 मतांनी निवडून येतील’ असे भविष्य आम्हाला सांगितले. मात्र, विजयाचा जल्लोष करता येणार नाही. कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू होईल हेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी अशोक खरात यांनी आम्हाला सांगितलेल्या गोष्टी आम्ही लिहून घेतल्या व माणिकराव कोकाटे यांनादेखील सांगितल्या.त्यानंतर मतदान पार पडले आणि महिनाभरानंतर झालेल्या मतमोजणीत माणिकराव कोकाटे हे खरात यांना केलेल्या भविष्यवाणी प्रमाणेच 23 हजार 450 मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे, मतमोजणी होऊन परतत असताना शिंदे गावाजवळ दुर्घटना घडवून खरात यांनी सांगितल्याप्रमाणे दोन कार्यकर्त्यांचा जागेवर मृत्यूदेखील झाला.
खरात जे बोलतात ते तसेच दिलेल्या वेळेत शंभर टक्के घडते त्यामुळे ही व्यक्ती सर्वसामान्य नाही काहीतरी आगळीवेगळी आहे, हे मला मनोमन पटले आणि त्यानंतर खरात व मी एकमेकांच्या सान्निध्यात नियमित येऊ लागलो, असा उल्लेखदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. दरम्यान, नामकर्ण आवारे गेल्या काही वर्षांपासून या ट्रस्टपासून चार हात लांब होते. त्यामुळे आता या प्रकरणात माजी विश्वस्तांची चौकशीसाठी एसआयटी कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.

चौकशीचा फास आवळणार?

एकीकडे भोंदू अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत असताना या आत्मचरित्रातील लेखामुळे पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. भोंदू अशोक खरात हा अशाच पद्धतीने लोकांना खोटी माहिती देऊन फसवत होता का, हा प्रश्नदेखील आता या पुस्तकाच्या लेखानंतर उभा राहिला आहे.

 

 

In Aware’s autobiography, he is a proven man who is a fraud!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *