काही दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी-2’ प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गोष्टीप्रमाणे सेम टू सेम म्हणावा असा प्रकार अशोका मार्गावरील एका आयटी कंपनीत दोन दिवसांपूर्वी झालेला सर्वांनी पाहिला. एकच सूर निघाला, कमावण्याच्या नादात मुलींना आपण काय गमावले याचे भानही नसावे का?
नुकतेच ‘द केरळ स्टोरी-2’ सिनेमात तरुण मुलींना मुस्लिम तरुण मुले प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. लग्न करतात. मुले जन्माला घालतात. धर्मांतर करण्यास भाग पाडतात. त्यानंतर अतोनात छळ सुरू होतो. लव्ह जिहादसारखी प्रकरणे वाढल्याचे यावरून दिसून येते. हळूहळू धर्मांतरण, मुलींना
फूस लावून पळवून नेणे, त्यांचे खून करणे आदी प्रकार या सिनेमातून दाखविण्यात आले आहेत. अशीच काहीशी स्टोरी सध्या नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. तरुण मुली, महिलांना आपल्यासोबत काय घडू शकते किंवा आजूबाजूला काय घडत आहे, याची जाणीव करून देण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटनांनी ‘द केरळ स्टोरी-2’ सिनेमाचे मोफत आयोजन केले होते. पण, पालथ्या घड्यावर पाणी असे म्हणायची वेळ या घटनेमुळे
आली आहे.
आता दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. अजून शहर आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात, कंपन्यांत, कार्पोरेट आस्थापनांमध्ये कुठे कुठे असे प्रकार घडत होते किंवा घडत आहेत, याविषयी सखोल तपास केला जाईल. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमधील एका आयटी कंपनीत काम करणार्या काही अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली, महिलांना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या मुली-महिलांना विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार करणे, छळ करणे, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य कार्यालयात करणे, जबरदस्तीने गोमांस खायला लावणे, धर्म स्वीकारायला लावणे, कपड्यांवरून, हिंदू देवदेवतांवरून, धर्मावरून बोलणे आदी प्रकार या मुली-महिलांबरोबर गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू होता.
असे म्हणतात की, स्त्रियांना सिक्स सेन्स असतो. जेव्हा या संशयितांनी आपले जाळे टाकण्यास सुरुवात केली तेव्हा हा सिक्स सेन्स कुठे गेला होता? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. एवढ्या वर्षात त्या सज्ञान मुली-महिलेला एकदाही संशय आला नाही. किंवा एवढी हतबल होती की, मुकाट्याने सर्वकाही सहन करत गेली असावी.
पालकांनी मुला-मुलींना स्वातंत्र्य दिले म्हणजे स्वैराचार नसून ,आर्थिक, मानसिक स्वावलंबी बनण्यासाठी पालकांचा मुलांवर असलेला विश्वास असतो; परंतु ती मुलगी किंवा फसवणूक झालेला मुलगा धर्मांतर करावे एवढे हतबल असावेत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
आजकाल नोकरी मिळविणे कठीण झाले आहे. त्या तुलनेत मुलांपेक्षा मुलींना लवकर नोकरी मिळते, असेही चित्र आहे. त्यामागे ‘द केरळ स्टोरी’सारखे प्रकार रॅकेट तर नसावे ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिणामी, मुला-मुलींच्या विशेषतः मुलींच्या वागण्यावर, शिक्षण, नोकरीवर अजूनच निर्बंंध लागण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. यावर पालक, मुला-मुलींचे समुपदेशन. पालकांनी आपल्या मुला-मुलींना विश्वासात घेत संवाद साधला पाहिजे. घरात सुरक्षित आणि मानसिक, भावनिक आधार आपल्या मुलांना दिला तर मुली प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांपासून लपवून ठेवणार नाहीत किंवा अपवादात्मक परिस्थितीत एकट्या मुली, महिलेवर कमावण्याची जबाबदारी असेल आणि अशा प्रकारांना सामोरे जावे लागल्यास संबंधित वरिष्ठांंशी या गोष्टी कानावर घालाव्यात किंवा सरळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. नाशिकमधील भोंदू अशोक खरात, रवींद्र एरंडे आणि आता आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणामुळे नाशिकचे नाव बदनाम होत आहे. ही बाब तर वेगळी, पण लिंगपिसाट बाबा, बुआ आणि धर्मांतरणासाठीचे हे तरुण यातून महिलांचा वापर करून हिंदू संस्कृतीला काळिमा फासत आहेत. पौराणिक संदर्भ असलेल्या नाशिक शहराची ओळख ही धार्मिक, सांस्कृतिक, तसेच प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. पंचवटी, काळाराम मंदिर, रामकुंड ही नाशिकची ओळख. बदलत्या काळानुसार आता वाइन कॅपिटल ऑफ इंडिया, वाइन सिटी आणि उद्योगांचे शहर म्हणूनदेखील नाशिक ओळखले जात आहे. समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर आणि रिंगरोडमुळे वाढणारी कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक आता वेगाने विकसित होणारे शहर म्हणून आगामी काळात ओळखले जाईल. महाराष्ट्रात केवळ नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेच कुंभमेळा होतो. आता तो पुढील वर्षी होऊ घातला आहे. गोदावरी नदीकाठावर वसलेले नाशिक प्राचीन शहर आहे. द्राक्षपंढरी ही नाशिकची ओळख. औद्योगिक विकासाच्या मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणातील महत्त्वाचा कोन नाशिक आहे. जवळपास अडीच हजार वर्षांचा इतिहास नाशिक शहराला आहे. अनेक धार्मिक विधी नाशिकमध्ये येऊनच केले जातात. अशा या नाशिकचा गौरवशाली लौकिक आहे. मात्र, दुर्दैवाने अशा नाशिकच्या लौकिकाला बट्टा लावणार्या दुष्प्रवृतींमुळे नाशिक गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. विकासाच्या आड न येता जो विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. झाडांचा मुद्दाही सध्या चांगलाच गाजत आहे. भररस्त्यात असलेली झाडे तोडण्यावरून मागील आठवड्यात वृक्षप्रेमी विरुद्ध स्थानिक नागरिक आमनेसामने आले. रस्त्यात असलेल्या या झाडांमुळे वाहतुकीची कोंडी होते. शिवाय, रात्रीच्या वेळी या झाडाला धडकून अनेक जण मृत झाले. झाडे दुसरीकडेही लावता येतील. पण एकदा का जीव गेला की तो परत कसा आणणार? त्यामुळे वाद टाळून हा प्रश्न सामंजस्याने सोडवणे गरजेचे आहे. नाशिक शहराचा लौकिक शांत, चांगले हवामान, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि विकसित होणारे शहर असा असताना गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार आणि वादाने गाजत आहे. कुंभनगरी असलेल्या या शहराची अशी बदनामी होणे चुकीचेच आहे. उलट शहराबद्दलचा अभिमान प्रत्येकाने बाळगून नावलौकिक कसा वाढेल, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पालकांची जबाबदारी वाढली
आयटी कंपनीत झालेल्या या धर्मांतरण प्रकरणाची पाळेमुळे पोलिसांनी खोदून काढण्याची गरज आहे. विशिष्ट कम्युनिटीकडून हिंदू धर्मातील मुलींना टार्गेट करून त्यांच्या धर्मांतराचा हा डाव एका मुलीच्या पालकाने दाखविलेल्या सजगतेमुळे उघड झाला. पोलिसांनीदेखील या कंपनीत नेमके काय चालते? याचा खोलात जाऊन शोध घेतल्यावर हे प्रकरण बाहेर आले. मुळात आपल्या मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून पालकांच्या ध्यानात ही बाब आली. त्यामुळे आपला पाल्य शाळेत जाणारा असो वा कंपनीत कामाला, पालकांनी कायमच दक्ष राहायला हवे. तरच ‘केरळ स्टोरी’सारखे प्रकार टळू शकतील.
Nashik’s Kerala Story!