सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय संस्कृतीमध्ये धर्म हा व्यक्तीच्या कर्तव्याशी अधिक जोडला गेला आहे, केवळ श्रद्धेशी नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मनाला अद्भुत शांती आणि मानसिक समाधान मिळते. म्हणूनच निसर्ग हादेखील एक धर्मच आहे. निसर्गातील प्रत्येक घटक काही ना काही दर्शवत असतो, पाण्याचा धर्म शीतलता, हवेचा धर्म चंचलता, अग्नीचा धर्म दाहकता, पाषाणाचा धर्म जडता आहे. हाच निसर्ग धर्म आपल्याला संयम, निरंतरता आणि परोपकार शिकवतो. त्यामुळेच निसर्गाचा आदर व रक्षण करणे आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. निसर्ग हा प्राणी समूहांचा जन्मोजन्मीचा सखा आहे. त्यात मानव हा समाजशील प्राणी आहे तो एकटा जगू शकत नाही. त्याला समाजातील, निसर्गातील प्रत्येक घटकाची गरज आहे. त्यामुळे निसर्गाशी त्याचे नाते घट्ट जोडले आहे. त्या निसर्गाला जपणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.
समाज आणि व्यक्तीचे कल्याण साधणारा, नैतिक मूल्यांचे रक्षण करणारा मार्ग म्हणजे धर्म होय. तो धर्म काळानुरुप बदलत असतो. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या काळात ’देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ यातून भरपूर प्रबोधन केले आहे. आजच्या युगात मानवाचा एकच धर्म असला पाहिजे तो म्हणजे निसर्ग धर्म. कारण याच धर्माची आज समाजाला खरी गरज आहे. तो धर्म सर्व मानवजातीने धारण केला तर मानवजातीचे रक्षण होईल.
मानवाला जिवंत राहण्यासाठी निसर्गातील प्रत्येक साधनसंपत्ती आवश्यक आहे. त्या साधनसंपत्तीचा वापर करून मानव आपला उदरनिर्वाह करत आहे आणि म्हणून तो जिवंत आहे. मानव जगला तर बाकीच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम माणसाचे जगणे महत्त्वाचे आहे. आदिमानव जेव्हा होता तेव्हादेखील त्याचा एकच धर्म होता तो म्हणजे निसर्ग धर्म. निसर्गातच तो राहत होता. अन्न, वस्त्र, निवारा तो निसर्गातच राहून मिळवत होता. सर्वात महत्त्वाचे त्याला कुठलेच दुःख नव्हते. तो आनंदात जगत होता. आदिमानवाची प्रगती झाली. त्यात इतका काही बदल झाला की माणूसच माणसाचा शत्रू बनला. माणसंच माणसांना मारायला उठली. माणसंच माणसाबरोबर युद्ध करू लागली. मानवातल्या संप्रदायातील धर्मावरून वाद करू लागली. तो त्याची मानव जात आणि निसर्ग धर्म विसरून गेला. फक्त विकास हवा या एकाच शब्दाच्या नावाखाली निसर्ग धर्म तोडू लागला. शेकडो वर्षे जुनी झाडी मग वड असेल, पिंपळ असेल त्यावरती कुर्हाड चालवू लागला. ’कुर्हाडीचा दांडा गोत्यास काळ’ असं मराठीत म्हणतात ते त्यामुळेच. ज्या निसर्गातून त्याची निर्मिती झाली तोच निसर्ग उदध्वस्त करण्याचे काम तोच दांडा करतो आहे. किती दुर्भाग्य आहे या समाजाचे.
निसर्गो रक्षति रक्षिता: निसर्गाचे रक्षण हेच देवाचे रक्षण आहे. निसर्गालाच देव असे संबोधतात. समग्रसृष्टी ही मानवाच्या उपभोगासाठी आहे. जगातील मानवाची निसर्गाविरुद्धची वाटचाल ही मानव जातीसाठी घातक आहे. मानव निसर्गाला आपल्या हातचे बाहुले बनवत आहे. ते निसर्ग कदापि ते सहन करणार नाही. सर्व मानवजातीने आपापसांतील सर्व मतभेद विसरून भविष्यकाळाच्या पिढीचा विचार करून आज निसर्ग हाच एकमेव धर्म मानून त्या धर्माचे रक्षण करावयाचे आहे. आज जर आपण चुकलो तर येणारा काळ कधीच माफ करणार नाही.
One Dharma-Nature Dharma