मालेगाव परिसरात मोसम नदीत पुन्हा रक्तमिश्रित पाणी

आंदोलनानंतर महानगरपालिकेच्या तीन अधिकार्‍यांचे निलंबन

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या कुर्बानीनंतर रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम नदीपात्रात वाहून गेल्याने नदीचे पाणी लाल झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने तीन अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, विशेष पथके, 24 तास नजर आणि नियमभंग करणार्‍यांवर कठोर कारवाईचे दावे करणार्‍या प्रशासनाचे सर्व उपाय अखेर फोल ठरल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने याप्रश्नी लढा देणारे सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी दिसताच आक्रमक भूमिका घेत सांडवा पुलावर धरणे आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाला ‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती’चे निखिल पवार, भाजपचे महानगरप्रमुख देवा पाटील, मराठा महासंघाचे भरत पाटील, गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आदींनी पाठिंबा दिला. आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, प्रांताधिकारी नितीन सदगीर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
आंदोलकांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी लावून धरल्यानंतर महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी शहर अभियंता कैलास बच्छाव, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे आणि प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या आदेशांनंतरही मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी जाण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात हलगर्जीपणा करणार्‍या इतर कर्मचार्‍यांवरही कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. बकरी ईदनिमित्त शहरात रस्त्यांवर होणारी बेकायदेशीर जनावरांची कत्तल रोखण्यासाठी यंदा महापालिकेने तात्पुरत्या कत्तलखान्यांची संख्या 12 वरून थेट 25 पर्यंत वाढवली होती. कायमस्वरूपी कत्तलखान्यांसह एकूण 26 अधिकृत ठिकाणे निश्चित केली होती. संवेदनशील भागांमध्ये ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे देखरेख आणि विशेष पथकांची नियुक्ती केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, एवढ्या उपाययोजनांनंतरही मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी वाहताना दिसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Blood-stained water again in Mosam river in Malegaon area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *