पुण्यात विषारी दारूचे पंधरा बळी

मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पुणे : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी (बनावट) दारू प्यायल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींना अजिबात सोडू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.

ही घटना प्रामुख्याने पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, दापोडी आणि पुण्यातील हडपसर या भागात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत या भागात दूषित देशी दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना पोटदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, या दारूमध्ये ’मिथेनॉल’ हे विषारी रसायन मिसळले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही काही बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली असून या घटनेला त्यांनी ’एका प्रकारची हत्याच’ म्हटले आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या एकाही दोषीला आणि तस्कराला सोडले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Fifteen victims of poisonous liquor in Pune

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *