25 मिमी नोंद, रस्ते जलमय; सिंहस्थ कामांचा बोजवारा
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या झळा सहन करणार्या नाशिककरांना मंगळवारी (दि. 2) दुपारी झालेल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा दिला. यंदाच्या हंगामातील पहिल्याच मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. सिंहस्थाची कामे सध्या सुरू आहेत. या कामांमुळे ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या खड्डयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडेही कोसळली. दिवसभर सोसाट्याचा वारा आणि पावसाची रिपरिप सुरूच होती. 25 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली.
मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल होऊन अडीच ते तीन यादरम्यान वादळी वार्यासह जोरदार पाऊस शहरातील सर्वच भागांत झाला. त्यामुळे उकाड्यापासून नाशिककरांना काहीअंशी दिलासा मिळाला. त्यानंतर दुपारी चारनंतरही एक तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सिंहस्थाच्या निमित्ताने विविध विकासकामे सुरू आहेत. यासाठी अनेक रस्त्यांवर खोदकामे करण्यात आली आहेत.
पावसामुळे या खोदकाम केलेल्या खड्डयांत पाणी साचले आहे. तसेच खोदकाम केलेलेे माती, दगड रस्त्यावर वाहून जात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. व्यावसायिकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. विक्रीसाठी ठेवलेले साहित्य पावसात भिजू नये म्हणून व्यावसायिकांकडून पावसापासून बचावासाठी अडोसा शोधण्यात येत होता.
दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली होती. कमाल तापमान चाळीस अंशांवर पोहोचले होते. किमान तापमानही 24 अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले होते. मात्र, मंगळवारी (दि. 2 जून) झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गोदावरीत ड्रेनेजचे पाणी
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावर अनेक विकासकामे सुरू आहेत. तसेच सिंहस्थासाठी लाखो भाविक गोदाकाठी येणार असल्याने गोदावरीचे पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे. मात्र सद्य परिस्थिती पाहता गोदावरीत थेट ड्रेनेजचे पाणी जात असल्याचे चित्र होते. तसेच शहरातील विविध भागातून वाहून आलेले पावसाचे पाणीही गोदावरीत जात असल्याने गोदावरी नदीचे शुध्दीकरण कुंभमेळ्यापर्यंत होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
सिंहस्थ कामांची तारांबळ
सिंहस्थाच्या पार्श्वभूमिवर विविध भागात कामे सुरू आहेत. मात्र ऐन वेळी पाऊस सुरू झाल्याने कामे थांबावी लागली तसेत अनेक ठिकाणी कामासाठी करण्यात आलेल्या खड्डयात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे अशा ठिकाणी सुचना फलक लावावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
Pre-monsoon rains in Nashik