सुतिका परिचर्या आणि आयुर्वेद

निसर्गाची सर्वांत सुंदर आणि अलौकिक निर्मिती म्हणजे मातृत्व! एका चिमुकल्या जिवाला जन्म देताना आईच्या शरीराची आणि मनाची प्रचंड दमछाक होते. या नाजूक काळात तिला सर्वांत जास्त गरज असते ती कुटुंबाच्या मायेची, आरामाची आणि योग्य काळजीची. आयुर्वेदात प्रसूतीनंतरच्या या अत्यंत महत्त्वाच्या काळाला ‘सुतिका काळ’ म्हटले जाते. या दिवसांत मातेची जी हळुवारपणे आणि शास्त्रशुद्ध काळजी घेतली जाते, तिला ‘सुतिका परिचर्या’ असे गोड नाव दिले आहे.
प्रसूतीच्या प्रक्रियेत मातेच्या शरीरातील वातदोष वाढलेला असतो आणि तिची पचनशक्ती (अग्नी) अतिशय नाजूक
झालेली असते.
प्रसूतीदरम्यान झालेली शारीरिक आणि मानसिक झीज भरून काढणे. वाढलेल्या वातदोषाला हळुवारपणे शांत करणे. बाळासाठी शुद्ध, सात्त्विक आणि भरपूर दुधाची (स्तन्य) निर्मिती करणे. गर्भाशयाची योग्य ती शुद्धी करून त्याला पूर्ववत आकारात आणणे. यासाठी सुतिका परिचर्या महत्त्वाची.
सुतिका अवस्थेत मातेची पचनशक्ती कमकुवत असते. त्यामुळे तिला एकदम जड अन्न न देता, दिवसांनुसार टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत प्रेमाने पौष्टिक आहार दिला जातो.
पहिले 1 ते 5 दिवस या काळात पचनशक्ती अत्यंत नाजूक असते. त्यामुळे अग्नी संवर्धन करणारा आहार मुगाचे कढण (सूप), तांदळाची मऊ पेज आणि त्यात थोडे जिरे, सुंठ व साजूक तूप घालून द्यावे. हा हलका आहार शरीराला अजिबात त्रास न देता पचनशक्ती हळूहळू वाढवतो.
पुढे 6 ते 12 दिवस भूक थोडी वाढू लागल्यावर मुगाची खिचडी, मऊ भात आणि फुलका सुरू करावा. या काळात साजूक तुपाचा (गोघृत) सढळ हाताने वापर करावा, ज्यामुळे आतड्यांना स्निग्धता मिळते आणि वात शांत होतो.
12 दिवसांनंतर शरीराला ताकद देण्याची वेळ असते. गव्हाची खीर, दूध, बदाम आणि नेहमीची पचायला हलकी पोळी-भाजी (उदा. दुधी भोपळा, पडवळ, कारले) सुरू
करता येते.
डिंक (सांधे व हाडांच्या बळकटीसाठी), अळीव (लोह आणि कॅल्शियमसाठी) आणि मेथीचे (कंबरदुखी आणि वात कमी करण्यासाठी) लाडू मातेला आवर्जून
खायला द्यावेत.
बाळाच्या दुधासाठी लसूण, बाजरी, खसखस आणि शतावरी अत्यंत उपयुक्त आहेत. लसूण क्षीरपाक (लसूण आणि दूध एकत्र उकळून केलेले पेय) किंवा लसणाची चटणी आहारात नक्की असावी.
शिळे, अति थंड (आइस्क्रीम/कोल्ड्रिंक्स) आणि कोरडे अन्न टाळावे.
पचायला जड असलेले वाटाणा, हरभरा, राजमा यांसारखे पदार्थ टाळावेत, कारण यामुळे पोटफुगी वाढते.
अति तिखट, मसालेदार आणि बेकरीचे (मैद्याचे) पदार्थ टाळावेत, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
मातेने साधे किंवा अति थंड पाणी पिणे पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी ओवा, सुंठ किंवा वाळा टाकून उकळलेले आणि नंतर कोमट केलेले पाणीच दिवसभर प्यावे. हे पाणी पोटाला आराम देते आणि गॅसेसचा त्रास
दूर करते.
आहारासोबतच मातेच्या शरीराला बाहेरूनही तितक्याच जपणुकीची आवश्यकता असते.
रोज संपूर्ण शरीराला कोमट औषधी तेलाने (उदा. बाला, धन्वंतरी किंवा नारायण तेल) अतिशय हलक्या हाताने मालिश करावी. यामुळे मातेचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो व स्नायूंना आराम मिळतो.
मालिश झाल्यावर निर्गुंडी किंवा कडुनिंबाचा पाला उकळलेल्या गरम पाण्याने अंघोळ करावी. यामुळे शरीराला जंतुसंसर्गापासून सुरक्षित ठेवता येते.
पोटात वात साचू नये, पोटाचा आकार पूर्ववत व्हावा आणि पाठीला चांगला आधार मिळावा, यासाठी पाठीवरून पोटाला लांब सुती कापडाने हळुवार पण घट्ट बांधावे.
नवमातेने किमान सव्वा महिना (45 दिवस) भरपूर विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे. अति बोलणे, जागरण किंवा जड वजन उचलणे कटाक्षाने टाळावे.
आयुर्वेदाने या काळात शरीराला आतून बळ देण्यासाठी काही उत्तम औषधी सांगितल्या आहेत. औषधे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

Postpartum Care and Ayurveda

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *