भूस्खलनानंतर प्रशासनाचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ’मिसिंग लिंक’ प्रकल्पावर सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. पुलावरील बोगद्याच्या प्रवेशद्वारावर अंदाजे 200 मीटर उंचीवरून दरड कोसळल्याने प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला. महामार्गावरील दरडप्रवण क्षेत्रात 50 मीटरपर्यंत संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या, मात्र दरड खूप उंचावरून आल्याने हा प्रकार घडला. नुकतेच या प्रकल्पावर खड्डे पडल्याचेही समोर आले होते, त्यातच आता दरड कोसळल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत आणि कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाची सुरक्षितता आणि बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील ’मिसिंग लिंक’चे आयआयटी मुंबई मार्फत ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या दुर्घटनेत ’मिसिंग लिंक’चा स्लॅब किंवा कोणताही संरचनात्मक भाग कोसळला नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती असून मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागलेला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सुरक्षेशी कोणतीही तडजोड नको म्हणून एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकल्पाची आयआयटीच्या तज्ज्ञांकडून तपासणी (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर हे तज्ज्ञ प्रत्यक्ष पाहणी करतील आणि अतिवृष्टीमुळे बांधकामाला काही धक्का लागला आहे का, याची सखोल पडताळणी करतील.
सध्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर अडकलेल्या गाड्या सुरक्षितपणे पुढे काढण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नव्याने वाहने महामार्गावर येऊ नयेत आणि संभाव्य धोका टळावा यासाठी, जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय मुंबई-पुणे प्रवास करू नये, असे महत्त्वपूर्ण आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.
IIT to conduct audit of ‘missing link’