‘उबाठा’ पक्षात शेवटपर्यंत तिघेच उरतील

मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंना टोला

नाशिक : प्रतिनिधी
पक्षात राम उरला नाही, त्यामुळे त्यांना पक्ष वाचविण्यासाठी रामरक्षा म्हणण्याची वेळ आली आहे. दररोज लोक बाहेर पडत आहेत. शेवटपर्यंत कदाचित तिघेच शिल्लक उरतील, असा टोला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे पिता- पुत्रास लगावला.
कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीका केली. आम्ही काय करतो यापेक्षा तुम्ही काय करता याकडे लक्ष द्या. मागेपुढे तुमच्या पक्षात तीनच लोक राहतील, अजूनही लोक फुटण्याच्या मार्गावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर देताना, इतकी वर्षे तुम्हीच मोदीसाहेबांचे गुणगान करत होतात. आधी तुमचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्या, असेही महाजन
म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता, आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार असून, त्यांनी त्यांची भूमिका सरकारसमोर मांडावी, असे महाजन म्हणाले.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले असून, कुंभमेळा संपेपर्यंत हे कार्यालय कार्यरत राहणार आहे. विविध विभागांच्या अधिकार्‍यांसोबत बैठकीत कामांचा आढावा घेण्यात आला असून, सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत सुरूअसलेल्या वृक्षारोपण मोहिमेची माहिती देताना महाजन म्हणाले की, दर रविवारी आठ ते दहा हजार झाडे लावली जात आहेत. आज चार ते पाच हजार झाडे लावण्यात आली असून पुढील दोन दिवसांत विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणात सहभागी होणार आहेत.
गोदावरी नदी प्रदूषणाबाबत बोलताना महाजन म्हणाले की, शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येत असून त्याचे काम चार महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाणार असून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संवाद सर्वांना ऐकविण्याची गरज नाही
आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी स्पीकर फोनवर केलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत ते म्हणाले लोडशेडिंगच्या प्रश्नावर मीही अधिकार्‍यांशी बोललो आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे संवाद स्पीकरवर करून सर्वांना ऐकवण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी आवश्यक ती समज असली पाहिजे, असे महाजन यावेळी म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढू

शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी सांगितले की, सुमारे 80 टक्के शेतकर्‍यांचे प्रश्न निकाली निघाले असून, उर्वरित 15 ते 20 टक्के शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरही तोडगा काढण्यासाठी आपण स्वतः जाऊन चर्चा करणार आहोत.

Only three people will remain in the ‘Ubatha’ party until the end.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *