खामखेडा वीज उपकेंद्रावर ‘अंधार जनआक्रोश’ मोर्चा

भारनियमनाविरोधात शेतकर्‍यांचा हुंकार; ‘अंधार नको, वीज हवी’

खामखेडा : वार्ताहर
गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतशिवारात वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे संतप्त झालेल्या देवळा तालुक्यातील खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 18ै) सायंकाळी 7.30 वाजता महावितरणच्या 33/11 केव्ही उपकेंद्रावर ‘अंधार जनआक्रोश’ मोर्चा काढला. हातात मेणबत्त्या, कंदील आणि मशाली घेतलेल्या शेकडो आंदोलकांनी “अंधार नको, वीज हवी!” अशा घोषणा देत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला.
महावितरणकडून “इमर्जन्सी लोडशेडिंग”च्या नावाखाली सायंकाळच्या वेळेस वीजपुरवठा खंडित केला जात आहे. बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या या भागात वीज नसल्याने शेतकरी, महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तसेच अंधारामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येचा जाब विचारण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके व पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलकांतर्फे महावितरणच्या कर्मचार्‍यांना निवेदन
देण्यात आले.

…तर कार्यालयास कुलूप ठोकणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, सरपंच अ‍ॅड. वैभव पवार, तंटामुक्त अध्यक्ष सुनील शेवाळे व शरद बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. शेतशिवारातील लोडशेडिंग तत्काळ रद्द करून नियमित वीज न दिल्यास महावितरणच्या कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात खामखेडा, सावकी, भऊर व विठेवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘Public Outcry Against Darkness’ Protest at Khamkheda Power Substation

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *