सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांचा इशारा
सिडको : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सातत्याने होत असलेल्या अपघातांवर संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांवर गंभीर आरोप करत राजीव गांधी भवनासमोर दशक्रिया विधी करण्याचा इशारा दिला आहे.
दातीर यांनी म्हटले आहे की, शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले असून, कामांचे योग्य नियोजन नाही. वाहतुकीचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एक दिवस कर न भरल्यास नागरिकांवर कारवाई करणारे अधिकारी मात्र नागरिकांच्या जीवित सुरक्षेबाबत निष्क्रिय असल्याची टीकाही
त्यांनी केली.
गरवारे ते पपया नर्सरी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी संबंधित कामाचे टेंडर कोणाला देण्यात आले, कोणत्या निधीतून काम सुरू आहे, त्याची रक्कम किती, कामाची मुदत किती आणि ठेकेदार कोण, याची माहिती देणारा फलक नियमांनुसार लावण्यात आलेला नसल्याचा आरोप केला. अशा फलकांच्या अभावामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले. अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन त्यांची भरपाई होऊ शकत नाही. नाशिक महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठा वाटा उचलणार्या एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याची टीका करत त्यांनी लोकप्रतिनिधींनाही जबाबदार धरले. विकासकामांचे श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी अपघात झाल्यानंतर मात्र जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. साहेबराव दातीर यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देत उपाययोजना न झाल्यास आणि पुन्हा एखाद्या नागरिकाचा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तसेच दशक्रिया विधी राजीव गांधी भवन प्रवेशद्वारासमोर करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
…then the Dashakriya ritual will be performed in front of the Municipal Corporation.